Friday, February 27, 2009

मंदाकिनी

पाऊस आला पाहिला,
ना पाहिला मी सोहळा,
मृद्गंध सारा लोटला,
तोही असे ना वेगळा

शब्दास आली ही कळा,
दूरस्थ भासे भावना,
अल्हाद ना दे मानसी,
जैशी सुखाची शर्तशी

संगीत माया धुंदशी,
बेधुंद काया गुंगशी,
ना गंध वाटे त्यातही,
ना मग्न झाले आजही

झाले कसे वेडेपिसे,
हे अंतरीचे गूढसे,
कोणी असे का दूरचे,
लावी मनाला ओढसे




खरं सांगतो, हा वर जो काही प्रकार तयार झालाय, तो लिहिताना नाकी नऊ आले. बऱ्याच ब्लॉगवर मध्यंतरी कविता कविता पाहिल्या. मधे कुठेतरी वृत्तं वगैरेपण वाचली. मनोगत.कॉम ला धन्यवाद. तिथुनच हा किडा घुसला मनात. (मधेच सगळी वृत्तं, यमक वगैरेची बंधनं झुगाडून प्रसून जोशी सारखा धडा लिहायचा विचार आलेला पण त्याच्यासारखे आपल्याकडे शब्दभांडारही नाही आणि परत त्याला संगित लावून पावन करायला रेहमानही नाही). असो. मंदाकिनी मधे लिहायचा केलेला पहिला प्रयत्न आहे (म्हणून नाव पण तेच आहे. काही दुसरं सुचवलं कोणी तरी चालेल). समस्त कवीवर्गास अर्पण. आणि खरच, हे जो लोक वृत्तात वगैरे बसवून कविता लिहितात त्याना मनापासून सलाम. लयी महान आहात राव आपण! मलाही मजा आली आणि तेवढीच तारांबळही उडाली. :)

Tuesday, February 17, 2009

नॅनी

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.
मी: Hey ... you there?

.
.
.
.
नॅनी: तू हल्ली ईतका बिजी कसा?
Sent at 11:16 AM on Monday
.
.

मी: सध्या जरा सिन्सिअर व्हायचे भूत चढलय ... मे बी त्याच्यामुळे
नॅनी: ईतका की ब्लॉगवर पण काही टाकला नाहीस. कित्येक वर्षात! १०० वर्ष झाली असतील!!!
मी: जखमेवर बोट!! :(
नॅनी: बिजी ऑफिसमधे. घरी काय बिजी ठेवतात तुला हे विचारतीये!
मी: कॉल्स असतात यार पुण्यामधे.
नॅनी: ऑफिसमधे प्युन तुझ्यापेक्षा जास्ती बिजी असेल.
मी: ;)
नॅनी: का काय झालं?
मी: आजतक मै तुमसे झूठ बोल रहा था. मै प्युन हू. हा ... मै प्युनही हू.
नॅनी: तुझी कंपनी भारी आहे बाबा. प्युनला अमेरीकेत ट्रान्सफर करतात!
मी: ईथे महाग असतात बाबा प्युन.
नॅनी: :) असो. पण ब्लॉगपासून दुरी का?
मी: परत जखमेवर बोट!
नॅनी: जखमच का खरं?
मी: नाहीतर काय? सप्टेंबर पासून नवा पोस्ट नाही. मग जखमच की!
नॅनी: तेच तर म्हणतीये.
मी: ११ अनपब्लीश्ड पोस्ट आहेत यार. सगळे अर्धवट राहिलेत. च्यायला मन पुढे सरकले की परत मागच्या विषयावर येतच नाही.
असो.
बघू.
होयेगा.
कुछ तो होयेगा.
हा वीकेंड.
गच्चीसाठी खच्ची!
नॅनी: चलो ... झोपायला जाते.
मी: बाय.
नॅनी: बाय. आणि लिही काहीतरी. तुझे पोस्ट्स खरच मिस् करते मी.
मी: आई शप्पथ! लेखक पेटला आता. लेखकाला माहितच नव्हते की त्याला कोणी मिस् करते. आता बासच.
हर हर महादेव.
नॅनी: :)
मी: झोप तू आता. सोक्ष मोक्ष लावतोच मी आता ईकडे.
नॅनी: पेटते रहो.

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.

.
.
.
.
.
.

कोणाशी कधी कसे सुत जमावं याचा काही नेम नाही. एकदम अनपेक्षीत प्रकारे, काहीही कारण नसताना, किंबहुना चुकूनच आमची गाठभेट झाली. सुमारे ३ वर्ष झाली आता या ओळखीला. हा अनपेक्षीत प्रकार म्हणजे एक ईमेल होते की जे चुकुन मला आलेले.

आपल्या पुढची जनरेशन जशी नेहमी एकदम पांडू वाटते तशी नॅनीपण जरा पाकाऊ होती. चॅटमधे भरपूर "?" आणि "!"! शेवटचे अक्षर अगदी ओळभरेपर्यंत टाईप करणे हे असले प्रकार ठासून भरलेले. ईंटरनेट, ईमेल्स आणि चॅटचे पहिले नऊ दिवस सुरू असल्याने तेच तेच जुने झालेले फॉरवर्ड ईमेल्स पाठवायची. आठवड्याला "Must See...", "don't ignore", "toooooo good" या असल्या ईमेल्सचा रतिब टाकायची. आपण पाठवतो त्या ईमेल मधे काय आहे हे बघायच्या आधीच, माहित असल्या नसल्यांच्या ईनबॉक्समधे ते ईमेल पोहोचवणे म्हणजे आपले परमकर्तव्य आहे असे मानणाऱ्या लोकांपैकी एक होती ती. सुत जुळावे असे आणखी काहीच आमच्यात नव्हते - फक्त डेस्टीनी. माझ्या लेखी सर्वार्थाने निरर्थक प्रकारामधे मोडणारे सगळे गूण तिच्यात. आणि रूड हा शिक्का माझ्यावर आधीपासूनच. एकमेकाशी बोलण्याचे - बोलत राहण्याचे आम्हाला काहीच कारण नव्हते. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी, "चल जा गेलास ऊडत" असे झाले असते तरी कोणालही नवल वाटले नसते. पण असे झाले नाही. उलट जास्तीच ट्युनींग जमत गेलं.

एकमेकांकडून काडीचीही अपेक्षा नाही आणि काही गमावण्याचे भय नाही. कदाचीत अशी एक बाजू कदाचीत प्रत्येकाला असते. आहेत त्या सर्व नात्यांना समांतर. आणि ती तशीच रहावी म्हणून मूक धडपडही सुरू असते. एकमेकापासून अनभीज्ञ असण्यामुळे आमच्यातल्या बोलण्यावर आमच्या आजूबाजूच्या तत्कालीक गोष्टींचा फारसा प्रभाव पडलाच नाही. एकमेकाचे मूड्स वगैरे प्रकार फारसे मधे आलेच नाहीत. नॅनी ऊगाच शंभर प्रश्न विचारायची. "काय संबंध हिचा?" हा विचार येण्यापेक्षा "काय फरक पडणार आहे?" हा विचार डोक्यात यायचा. खरं म्हणजे तर आजीबाईसारखे ईतके प्रश्न विचारते म्हणून नॅनी नाव पडलेले. आज जेव्हा असे कधी कधी निवांत बसतो तेव्हा वाटते, यार ... ३ वर्ष! केवढे काही झाले यात. मीही कुठच्या कुठे आलो आणि ती ही! जिथे आमच्या बोलण्यात "हू केअरस्?" भाव असायचा, तिथे बरेच दिवस कोणी पींग नाही केले की त्याचीही नोंद असायची. आणि हे असेच तब्बल ३ वर्ष सुरू आहे. मित्र व्हायला प्रत्यक्ष भेटायला थोडीच लागतं? बरेच किस्से ऐकलेले असे पेन फ्रेंड्स वगैरेचे. नॅनीमुळे मलाही असा एक अनुभव आला.

पण जरा विचार केला की वाटते की यात माझाच स्वार्थ होता. म्हणजे ते असे की कुठेतरी या मागच्या ईतक्या वर्षात हळू हळू मी स्वतःच गढूळ होत गेल्याची भावना येत होती. हाताकड बघीतलं की वाटायचं की यार ३-४ च तर रेघा आहेत. त्याही आखल्यासारख्या. असं कसं काय गिजमीट झाल्यासारखं वाटतय सगळं? बऱ्याच गोष्टी, बरेच विचार आतल्या आतच रहायचे. बोलतो कशाला? उगाच वाटायचे की आधी स्वतःकडे बघा - असले काहीतरी मीच स्वतःला म्हणून गप्प व्हायचो. आपलं अक्षर जरी चांगलं असलं तरी आपली पाटीच कोरी नसेल तर वाचणार तरी कोण? कधी काळी यावर असेही म्हणलो असतो, मी कसा का असेना म्हणून मी काय म्हणतो त्याचे महत्व आणि त्याचा दर्जा कमी थोडाच होतो? पण हळू हळू हे ऊत्तर पटेनासे झाले. आजुबाजूच्या बऱ्याच गोष्टींसाठी मी एक मूक प्रेक्षक व्हायचो. आणि आपण मूकपणे बघतो, म्हणून शब्द आणखीच रसातळाला जायचे. पण या सगळ्या गढूळपणात मग एक असेही अंग पुढे यायचे की जे एकदम पारदर्शक, एकदम स्वच्छ असायचं. अर्थाअर्थी काही संबंध नसताना, केवळ यात काही अशुद्ध नाही म्हणून बरं वाटायचं. त्याच्या टिकण्यानं किंवा न टिकण्यानं कोणालाही काही फरक पडणार नसायचा. पण तरीही त्याचं अस्तित्व ऊगाचच निरागस वाटायचं. त्यात कशाचं भय नाही. त्यामधे अजुनही खुली किताब आहोत आपण असे वाटायचं. यातून तयार होणारा नॉस्टॅल्जीयाच मग पुढे ते टिकवायला भाग पाडायचा. नॅनीबरोबरचं नातं कदाचीत माझ्यासाठी असं होत गेलं. आणि ते असच ठेवलं यामागं हा ईतका सगळा स्वार्थ! पण ... हे असं सगळं मला हल्ली वाटतं. म्हणजे आफ्टरमॅथ.

आपण टप्प्या टप्प्यानं मोठं होतो. प्रत्येक टप्प्यावर आपण वेगळे. बेटा बेटावरून पुढे जातो. प्रत्येक बेटावर कोणाकोणाला भेटतो. बऱ्याच कला दाखवतो. त्याची कदरही होते. त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षांचे मुठभर मास चढवून मग पुढच्या बेटावर जातो. पण मग त्याच कला कलेकलेने मारूनही टाकतो. एक वेगळंच रुप घेतो. नव्या बेटावरच्या नव्या कला. चक्र सुरू. आणि मग परत एकदा या जुन्या बेटावरच्या सवंगड्यांची भेट झाली की मग मुखवटा पांघरतो. जसे काही आपण अजुन तसेच आहोत. पण मुखवट्यावीना होती ती मजा त्यात राहत नाही. कदाचीत समोरच्याला तिच मजा येतही असेल पण ते श्रेय कदाचीत मुखवट्याला आहे. बरीच बेटं पार केल्यावर, बरेच मुखवटे जमतात. आणि मग अचानक कुठेतरी एक जागा मिळते जिथे मुखवट्याची गरजच लागत नाही. कारण सगळंच अनोळखी. दरवेळी तितकंच नवं. मुखवट्यावीना स्वतःला बघणेही तितकेच रंजक. पुर्वी पुण्यात असताना दर वीकेंडला आश्रमातल्या मुलाना भेटायला जायचो. दरवेळी प्रचंड ताजंतवानं वाटायचं. त्या लहान लहान मुलांचा ऊत्साह बघून स्फुरण चढायचं. पण गेली २ वर्ष आता तो आश्रमही नाही आणि ती मुलंही नाहीत. अगदी तेवढं नाही, पण त्याची आठवण करून देणारं असं काहीतरी आहे हे बिना मुखवट्याचं वावरण्यात. नॅनी आणि माझी बडबड प्रसंगी अगदी निरर्थकही असली तरी यात अशी गोडी आहे. एकमेकाला चुकायचा स्कोपही आम्ही देत नाही आणि बरोबर चुक मोजतही नाही. एकदम काहीच्या काही बडबडत राहाणं आणि काहीच मनाला लावून न घेणं.

गेले ३ वर्ष ईतके काही झाले न भेटता. पुढेही कधी भेटू याची खात्री नाही. Thanks to Globalization. नॅनीचे लग्नही आहे आता थोड्या दिवसात. तिचे करीअरही सुरू होईल. एकामागून एक नव्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेईल. माझ्याही ऑफिसमधे माझ्या पुढच्या रोलची धडपड सुरू होईल. पायातली भिंगरी आणखी कुठेतरी घेऊन जाईल. आणखी एखादे बेट येईल. नवे लोक, नव्या कला, नवे मुखवटे. पण परत ती क्षणिक गडबड सरली की मेसेंजरवर एकमेकाला पिंग मारू ...

Hey ... you there?