Tuesday, February 18, 2014

अजनबी

अनोळखी शहरामध्ये आपुलकी सापडायची तिला. नवी नाती. नवी माणसं. कुठलाही पूर्वग्रह नाही. कुठलीही अपेक्षा नाही. उडत उडत आपोआप ती सर्वात उंच इमारतीच्या छतावर जाऊन पोहोचायची. टेकडी असेल, कधी कोणा अपार्टमेंटच्या टेरेस असेल, कधी कोणा restaurant मध्ये असेल. असं ठिकाण की जिथून अख्ख्या शहराचा आराखडा दिसावा. ते ठिकाण तिचं हक्काचं असायचं. नव्या शहराला लग्गेच आपलसं करायचा हा तिचा सर्वात आवडीचा मार्ग. तासंतास अशा ठिकाणी बसून राहायला तिला आवडे. "इथलं काहीच माहिती नाही" पासून, ते "यहासे दूर जहातक नजर जा रही है, वो सब मेरा इलाका है" असं फिलिंग येईपर्यंत. शहरांमध्ये चुकून कोणीतरी पेहचान का असलाच तरी तिला कोणीही रिसीव करायला नाही येणार, ही तिची अट असायची. कारण, बऱ्याचदा ती एक दिवस आधीच आलेली असायची. हा पहिला दिवस तिला स्वतःसाठी लागायचा. खूप उंचावरून पाण्यात उडी मारायच्या आधी, कठड्यावर काही क्षण काढतात न. तसा हा एक दिवस तिला लागायचा. यासाठी आदल्या दिवशी दुपारी किंवा रात्रीच पोहोचायची तरतूद केलेली असायची. शहर अगदीच अनोळखी असेल तर असलं काही करण्याची गरजच नाही.

रात्रीच्या काळोखात जे शहर दिसतं ते दिवसा नाही दिसू शकत अशा मताची ती. काळोखात न्हाऊन गेलेलं शहर. त्यामध्ये ती मिसळून जायची. या काळोखात समोर स्वतःचं तर प्रतिबिंब तर दिसत नाहीये न? हा प्रश्न तिला कधीच न सुटलेला? म्हणून तिनं असले प्रश्न ऑप्शनला टाकलेले. तसं असायचं काय समोर? लुकलुकणाऱ्या पिवळ्या नि लाल रंगाच्या लांबलचक ओळी. संपूर्ण शहरामधून अखंड पाळणाऱ्या. अधून मधून आपण बीझी असल्याचा चित्कार टाकणाऱ्या. कितीही उंच असली, तरी तिला ग्रीट करायला ते आवाज यायचेच. प्रत्येक शहराचा आवाजही वेगवेगळा. काही वेळा तिला ते आवाज मोठे वाटायचे. काही वेळा त्रस्त. काही वेळा निर्विकार. तर काही वेळा मौनी बाबासारखे, कळून न कळल्यासारखे. या आवाजाबरोबर त्या लाल पिवळ्या रांगांची चुळबुळ. बाजूला पांढर्‍या पिवळ्या पण अजिबात न लुकलुकणाऱ्या खिडक्या. काही पडद्या आड, काही काचे आड, काही गजा आड, तर काही सताड उघड्या. कदाचित प्रत्येक खिडकीची आपली आपली गोष्ट. तरी दुरून सगळ्या एकसारख्याच. रात्र जसजशी वाढत जाई, तसतशी ती लाल पिवळ्या ओळीनी आखलेली गडबड कमी होत जाई. खिडक्यांच्या पलीकडल्या गोष्टीना अर्धविराम मिळे. जीवाच्या आकांताने काहीतरी विकण्यासाठी अखंड जळत असलेले निर्विकार रंगीत साईन बोर्डस, हे एवढेच काय ते बाकी उरत. तिला हा सगळा बदल टिपत बसायला खूप आवडे. एखाद्या कॅनवास वरचे रंग हळू हळू निसटून, अख्खा कॅनवास आपल्यासाठी कोरा करकरीत होतोय असं तिला वाटे. आता हा कॅनवास रंगवायची संधी तिला मिळणार याचा आनंद कुठेतरी लपलेला असायचा त्यात. याच्याच कुठल्या तरी कोपर्‍यात तिची गोष्ट सुरु होणार. तिचे काही रंग तिथे सांडणार. काही रंग तिच्यावर उडणार. या अशा लघुकथांचं पुस्तक म्हणजे तिचं आयुष्य.

.............................


"मी खुश असेन, मी जे काही करेन त्यात. तुम्हाला आणखी काय हवंय?"
"असलं फालतू तत्वज्ञान नको सांगूस! चार लोक जे काय सांगतायत ते मूर्ख आहेत का?"
"चार चौघांनी केलं म्हणून करणं हे तरी कुठं हुशारीचं लक्षण आहे?"
"जगात तू एकटी हुशार! आम्हाला काही अक्कलच नाही की नाही?"
"मी जर मुलगा असते. तरीही तू मला असच अडवलं असतस?"
"हो. अगदीच अडवलं असतं! काळजी वाटणारच की तुझी!"
"मी चार चार चौघांच्या सारखं करणं तुझ्या लेखी जास्ती महत्वाचं आहे की मी खुश असणं?"
"... तुझ्या बाबांशी बोल तू!"

.............................

"तुझं कुठे काही ..."
"त्याचा काय संबंध?"
"आमचच चुकलं. तुझ्याकड लक्ष न दिल्याचा परिणाम!"
"तुमचं बारीक लक्ष होतं माझ्यावर."
"पण जग असच म्हणणार न!"
"तुम्ही जगाची फिकीर केली असती बाबा, तर मला असं वाढवलंच नसतं!"
"तुझा तो एक मित्र होता न ..."
"बॉंड गीरी करू नका."
"तो नसतो आज काल तुझ्या बरोबर."
"तुमचे ते एक टक्कल पडलेले, जाड काळा चष्मा घालणारे उंच मित्र होते. ते आज काल नसतात तुमच्या बरोबर!"
"या गोष्टी सारख्या नाहीयेत! उगाच अक्कल दाखवू नको! चार माणसं सांगतात म्हणून मुद्दाम हट्टानं उलट करायला बघातेयास तू!"
"मला सांगा मग, हे जे तुम्ही आणि आई ने, चार चौघांसारखे, चार चौघांसारखे वगैरे जे सुरु केलाय, तसं केलं की मगच माणूस खुश होतो. याची शाश्वती काय?"
"आम्ही खुश नाहीये का? आम्ही चार चौघांसाराखेच केले न? काय वाईट आहे त्यात?"
"इतका घाम गळून, इतकं शिकून, इतके कष्ट करून जर जीवाच्या आकांताने चार चौघांसाराखेच करायचे असेल तर मग काय मजा? तुम्हालाही तुम्ही काय म्हणताय ते पटत नाहीये बाबा! मान्य करा!"
"... तुझ्या आईशी बोल तू!"

............................

प्रत्येक शहरातली तिची माणसं वेगळी. त्यांच्याबरोबरच्या गोष्टी वेगळ्या. त्या सगळ्यांची ती आवडती. भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखी. जितक्या लवकर नव्या शहरामध्ये मिसळायची, तितक्याच लवकर त्यातून अलिप्त होऊन पुढेही निघून जायची. अशा या नव्या शहरांना मिठी मारण्यासाठी तिला अशा उंच जागांची गरज लागायची,

"Madam. It's closing time."

मंद वाऱ्यात उडणारे तिचे केस खूप लांबूनच लक्ष वेधून घ्यायचे. तेच थोडे बाजूला सारून, मग ती म्हणायची, "अरे यार ... आणि थोडा वेळ बसू दे न!!" समोरच्याची भाषा कुठलीही असली, तरी त्याला हे कळून जायचं. नाही कळलं तरी, तिच्या चेहऱ्याकडं बघून तिला नाही कोणीच म्हणायचं नाही! अतरंगी जागा शोधून काढायची ती, म्हणून बऱ्याचदा security guards च तिला हाकायला यायचे!

"Just a few more minutes Madam. We got to close it now!" किंवा "We don't allow anyone here" असलच काहीतरी म्हणायचे. पण तिला नाही म्हणणं त्यांच्या जीवावर यायचं! काही लोकांना हे वरदान असतं. तिलाही ते होतं!

"Thank you so much friend!" आणि अनोळखी शहरात तिनं हा पहिला मित्र बनवलेला असायचा.

Thursday, February 13, 2014

Happy Valentine's Day!

मी एक जाहिरात बघितली. कशाची होती आठवत नाही पण एक छान दृश्य होतं. त्यात एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आणि एक घोडा मित्र असतात. त्यांचा मालक ते पिल्लू विकून टाकतो. तर सगळे घोडे मिळून त्याला घेऊन जाणारी गाडी अडवतात. आणि मग ते पिल्लू परत येतं. आणि मग धावत धावत जाऊन मालकाला प्रेमानं मिठी मारतं! 

हेच जर माणसाचं असतं तर असं जे झालं ते सगळं विसरून मिठी मारायला जमलं असतं?

न वापरल्यामुळे खूप प्रमाणात उरलेली, देवानं दिलेली, विचार करायची क्षमता वापरून, आपण गोष्टी सोप्या करतो की क्लिष्ट करतो हा संशोधनाचा विषय वाटतो मला. विसरून जाणं ही कला जर जमली तर आई शप्पथ, किती गोष्टी निकालात निघतील! आजसे बीस साल पेहले जो थप्पड लगायी थी, उसकी गुंज आज तक कशाला आठवायला हवी?

खूप ओसरती पहिली जाहिरात ती पण छान वाटलं बघून. ते प्रेम बघून.

लहान मुलांचं नसतं? तुम्ही काहीही म्हणालात, किंवा केलात तरी नंतर येऊन चिकटायची ती चिकटतात. समोरच्याचं आपल्यावर केवळ प्रेमच असू शकतं. यावर गाढ विश्वास असतो त्यांचा. ते पुरतं त्यांना. आता आपण सगळेच कधी न कधी तरी लहान होतोच की! आता कुठल्याशा त्या क्षणाला आपण हे सगळं टाकून दिलं देव जाणे? 

असं तर होत नाहीये, की आपण कोणा कोणावर का का प्रेम नाही करायचं, याचीच मोठी यादी करतोय? की एखादं जरी चांगलं कारण असलं तरी तेही पुरतं आपल्याला प्रेम करायला? अप्रिय गोष्टी विसरायला?

आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आणि त्यांच्या कृती या सगळ्यांच्या केवळ चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी मनात ठेवणं आणि बाकी सगळ्याला फाटा देणं असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?

आजूबाजूच्या प्रत्येकावर प्रेम करण्याचं, आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आवडण्याचं, एक तरी कारण शोधणं असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?

गुलाबांच्या पाकळ्यांच्या पलीकडे, अंधुक मिणमिणत्या मेणबत्त्यांच्या पलीकडे, कागदावरच्या छापील भावनांच्या पलीकडे, केवळ दोन व्यक्तींमध्ये अडकून न पडलेलं प्रेम शोधणं, असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?

टाळलेला मोह ...!

|| श्री Valentineराव प्रसन्न ||



कॉलेज संपलं. पोरगी जवळपास पटलीच होती. सासराही खिशात होता. रांचोचा पूर्ण मामला सेट होता. पण ते सगळं सोडून पठ्ठ्या कितीतरी वर्षं अज्ञातवासात गेला! पुढे मग त्याला शेवटी पिया येऊन मिळते आणि उनकी नाक नही टकराती वगैरे बाकीचा तपशील सोडा. पण विचार करा या कॉलेज संपल्यापासून ते थेट ते परत भेटेपर्यंतचा भाग दाखवण्याचा मोह टाळणे किती कठीण काम आहे? तुम्ही केलाच नाही न विचार? कारण डायरेक्ट ते दोघे एकमेकांना मिळाले हेच पहिला तुम्ही! मला हा विचार आला. आणि धडकी भरली. मग राजू हिरानीचे आणखी आभार मानले मी. 3-idiots आणखी जास्ती आवडला! लौव ष्टोरीचा मोह टाळला आणि मग भले झाले असली उदाहरणं आपल्याला तशीही विशेष आवडतात! नाही पटत अजून? आता बघा काय काय होऊ शकलं असतं!

थोडा विचार करा!

सगळा मामला सेट असताना रांचो कॉलेज मधून गायब. पियाला पण पत्ता नाही. फरहान आणि राजू पण भांबावलेले. आता पिया आहे भरणार! मेरा प्यार खो गया वगैरे म्हणणार. मग कब तक कुवारी रहोगी म्हणून विरू सहस्रबुद्धे तिला मार्गी लावायची प्रयत्न सुरु करणार. तिकडे रांचोला ही परफेक्ट वेळ आहे हे कळणार! अशाच वेळी विकतची दुखणी आणि तत्वं घ्यायची असतात न! सगळं सुरळीत वगैरे करेल तर मजा काय! मग लगेच रांचो तत्वांशी प्रामाणिक होणार. मिया बीबी राजी वगैरे म्हणून हळूच पियाला संपर्क साधून सच सच सांगून, आपण प्यार पा लिया वगैरे ... आज्जीबात नाही करणार! झूठका सहारा लिया असं पिया म्हणेल म्हणून नाही. पिया म्हणालीही असती की झूठ वगैरे गेलं तेल लावत. तुला मी आवडते मला तू आवडतो. मग कशाला दंगा? पण मग वेळेचं महत्व कसं कळणार न? (मै समय हु. म्हणून लहानपणी आपल्या जनरेशनच्या मनावर वेळेचं महत्व बिंबवलय की नाही?) म्हणून तो तसलं काही आज्जीबात करणार नाही. तर तो पियाला आपल्या दिलमध्ये ठेवून, आपल्या आयुष्याच्या एकमेव ध्येयाकडे जाणार. सायन्स! आता मग त्याला दररोज प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये, प्रत्येक उपकरणामध्ये पिया दिसणार. एकटा नदीकाठी बसून सोनू निगम किंवा थेट आतिफ असलमला गाणी म्हणायला लावणार! त्याच्या सायन्स सेंटरला भेट द्यायला एखादे कपल आले की हा कपाळावर हात मारणार. कारण याला तो आणि पिया आठवणार. कोणी लग्नात आमंत्रण दिलं की याला पिया पहिल्यांदा भेटलेली ते आठवणार. अहाहा. या केवळ सुंदर आठवणी आहेत. याने मला काहीही फरक पडत नाही. हे तो स्वतःला समजावणार आणि प्रेक्षकांना रडवणार.

तिकडे पिया पण अस्ताव्यस्त. आता रांचो गेला. पण काहीतरी केलेच पाहिजे की. मग ती आधी मापात काढलेल्या जुन्या हिरोला पकडणार. तो चप्पल घड्याळांच्या किमती सांगणार. (विसरला? होता की तो एक ... मेरी घडी भी वोही समय दिखती है ... ज्याला म्हणालेला तो) तिला त्याच्या घड्याळ आणि चपलात रांचो दिसणार! पण ती तरीही स्वतःला समजावणार. की अरे हे असेच व्हायचे होते. रांचोची इच्छा हीच होती. नाहीतर थांबला असता न! मग ती स्वतःला या price tag वाल्या माणसाच्या प्रेमात पाडणार. त्यालाही आपल्या प्रेमात पडणार. रांचोच्या आठवणी तर केवळ अशाच! मंद वाऱ्याची झुळूक. गेलेला चांगला वेळ. एक स्वप्न. किंवा असच काहीतरी होतं. या अर्थच श्रेया घोशाल कडून गाणं म्हणवून घेणार.

आता अचानक सगळं सेट झालेलं असताना. मधेच रंचो उपटला तर मग तिच्या मनातली द्विधा दाखवणं हे किती बेष्ट! आहाहा! मग जरा गिल्ट वगैरे. आता तर मी इतके सारे घडवून आणले. आता मीच कशी माघारी फिरू? हा प्रश्न! सदा सुहागन राहो म्हणून तिच्या होणाऱ्या सासऱ्यांनी दिलेला आशीर्वाद तिच्या कानात घुमणार! तसा तिनं स्वतःला सुद्धा या price tag वाल्याच्या प्रेमात पडलयच की! आता आला पहिला हिरो म्हणून अशी कशी टाकेल याला? साजन मध्ये माधुरी नाही म्हणत? मला पण वोटिंगचा हक्क मिळाला पाहिजे! तुम्ही दोघेच का ठरवणार? तसं!

तुम्हाला काय वाटलं की एक फोन आला नी लगेच पिया गेली रांचोकडे? किती काय काय होऊ शकलं असतं!

झालंच तर आणखीही शक्यता आहेतच की. मैने "रांचो"को मनसे अपना पती मान लिया है असं म्हणून पिया काही वर्षं जावेद जाफरी बरोबर पण संसार थाटू शकेल. बघा, वाईट डील नाहीये. श्रीमंत आहे. छान ठिकाणी राहतो. बाप पण मेलाय त्याचा. किंवा वांगडू आडनाव आपल्यामध्ये कसं चालेल म्हणून विरू सहस्रबुद्धे नवीन प्रॉब्लेम तयार करू शकतील! किंवा खास वैचारिक लोकांसाठी, असंही होऊ शकेल. पिया आणि रंचो भेटले. मग ते चर्चा करतील. मुझे अब लौट जाना होगा. ये सही नही है. जमाना हमे जिने नाही देगा. हम अमुक अमुक को क्या मुह दिखायेंगे? असले प्रश्न पडूच शकतात की. तशी मी परवा एक फिल्म पहिली. त्यात एका बहिणीबरोबर लग्न होत असताना शेवटी हिरो म्हणतो अरे थांबा. नेम चुकला. मला त्या दुसरी बरोबर लग्न करायचंय. मग त्यांना असले अमुक अमुक को कैसा मुह दिखायेंगे वगैरे प्रश्न नाही पडत. सुरळीत होतं सगळं. पण असो. तो पण एक टाळलेला मोह असावा! 

विचार करा. काहीही होऊ शकलं असतं!
हे सगळं डोळ्यासमोर आलं आणि मग 3-idiots किती पटीमध्ये जास्ती आवडला काय सांगू? राजू हिरानीला धन्यवाद! किंवा त्या सगळ्यांनाच धन्यवाद! ऐसेहीच taken for granted नही लो!

या valentine's day ला अशा साऱ्या टाळलेल्या लौव ष्टोरीना सलाम! Let's thank them all for not existing and making our life beautiful! 

Happy Valentine's Day!

आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या आणखी प्रेमी मित्र मैत्रीणीना शेअर करालच अशी अपेक्षा. कळावे. लोभ असावा.
(या शेअर करण्याच्या आणि करवण्याच्या सवयीबद्दल कधीतरी खास लिहायला आवडेल! ... पुढच्या वेळी!)