Thursday, April 20, 2023

कुछ नया करते है - भाग २: ट्रान्सिस्टरची गोष्ट

प्रस्तावना:
एका जूनच्या संध्याकाळी सॅनफ्रांसिस्कोच्या हॉटेल मध्ये एक गोपनीय मिटिंग सुरु होती. मीटिंग मधल्या आठही जणांनी एक डॉलरच्या नोटेवर एक एक करून सही केली आणि इतिहास रचला. या अष्टविनायकांनी ठरवलं की आपण आपली सध्याची कंपनी सोडायची आणि आपली नवीन कंपनी सुरु करायची.
.
Sounds familiar? पण ही गोष्ट १९५७ ची आहे. उस जमाने की स्टार्टअप स्टोरी... असं म्हणू. न्यू यॉर्क टाइम्सने नंतर या घटनेची नोंद "टॉप टेन डेज दॅट चेंज्ड दी हिस्टरी" म्हणून केलेली.
.
या आठ लोकांच्या पैकी कमीत कमी गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉईस कदाचित माहिती असतील. गॉर्डन मूर म्हणजे तोच तो ज्याने नंतर मूर-लॉ बनवला (की जो अजूनही भारी आहे). आणि रॉबर्ट नॉईस म्हणजे तोच तो ज्याने (आणि गॉर्डनने) एका स्टार्टअपनं भागलं नाही म्हणून पुढे जाऊन अजून एक स्टार्टअप काढली - "इंटेल" नावाची.
तसा नॉईस नंतर गरजू होतकरू तरुणांना मार्गदर्शन करत असायचा. त्यातल्या एका स्टीव्हने काढलेली स्टार्टअप सुद्धा माहिती असेल - ऍपल नावाची.
.
१९५७ ला या आठ जणांनी "आज कुछ तुफानी करते है" म्हणत जी कंपनी बनवली, त्याचं नाव "फेअरचाईल्ड सेमीकंडक्टर्स". या कंपनीने सुद्धा इतिहास रचला. आज कुठलाही फोन किंवा कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट उघडून बघितलं की आतमध्ये नखा एवढेसेच किंवा कधी कधी थोडे मोठे काळपट चपटे ठोकळे दिसतात. याना म्हणतात इंटिग्रेटेड सर्किट्स. यांच्यामुळे आपले गॅजेट्स लहानात लहान आणि हुशारात हुशार होऊ शकतात. तर "फेअरचाईल्ड सेमीकंडक्टर्स" या कंपनीने सर्व प्रथम इंटिग्रेटेड सर्किट्स हा प्रकार बनवून दाखवला आणि सगळ्यांच्या चक्कीत धूर आणला. पुढे या इंटिग्रेटेड सर्किट्सनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचाच चेहरा मोहरा बदलून टाकला.
.
आणि हो... आज तंत्रज्ञान क्षेत्राचा खूप महत्वाचा भाग असलेली सिलीकॉन व्हॅली ही सुद्धा या आठ जणांनी सुरु केली. त्यात स्टीव्ह जॉब्स म्हणा, बिल गेट्स म्हणा, मार्क झुकरबर्ग म्हणा, हे सगळे खेळले बागडले.
.
या आठ जणांना "ट्रेचरस एट" म्हणून ओळखलं जातं.
.
***************************
नमनाला हे घडाभर तेल झालं. आता मूळ गोष्टीकडे येऊ. कारण ही गोष्ट ना रॉबर्ट नॉईसची, ना गॉर्डन मूरची, ना स्टीव्ह जॉब्स ची, ना सिलिकॉन व्हॅली ची, ना या ट्रेचरस एट ची.
.
ही गोष्ट या आठ जणांना एकत्र आणलेल्या एका बाबाची आहे. "सब चले पूरब तो हम चले पश्चिम" म्हणत या बाबाने जग ईस्ट कोस्टवर कंपन्या काढत होते तेव्हा वेस्ट कोस्टच्या कॅलिफोर्निया मध्ये जाऊन कंपनी काढला, आठ लै भारी इंजीनिअरना हुडकला, आणि एक कमाल प्रश्न सोडवायला दिला. त्याला अर्थातच अपेक्षित क्रांती करता आली नाही. कारण आठही जण, "आपला बॉस किती खडूस आहे" म्हणून सोडून गेले. पण... त्याचा पिच्चर तंभीभी बाकी होता मेरे दोस्त कारण या बाबाला पुढे १९५६ मध्ये नोबेल सुद्धा मिळालं! तर ही आजची गोष्ट.
.
तशी ही गोष्ट कुठूनही सुरु केली... तरी ड्रॅमॅटिकच वाटते. आपण सुरु करू १९४५ पासून. दुसऱ्या महायुद्धानंतर पासून. तेव्हा व्हॅक्युम ट्यूब वापरून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू बनायच्या. साहजिकच व्हॅक्युम ट्यूब हे प्रकरण त्या काळासाठी खूप कमाल असलं तरी खूप नाजूक होतं. यावर तोडगा काढण्यासाठी AT&T च्या बेल लॅबच्या मर्विन केली ने एक टीम बनवली. ही अतरंगी टीम म्हणजे आपल्या गोष्टीचे अमर, अकबर आणि अँथनी. या तिघांनी ट्रान्सिस्टर बनवायचं हे त्यांचं काम मनावर घ्यायचं होतं. हा ट्रान्सिस्टर व्हॅक्यूम ट्युबपेक्षा भरी तर असणारच होता, पण त्याने खूप लहान आणि कमी नाजूकसुद्धा असायचं होतं.
.
या कामासाठी एकत्र आलेल्या या तिघांच्यातला सगळ्यात बुड्ढा माणूस वॉल्टर ब्रॅटन - हा होता एक्सपेरीमेंटल फिजिसिस्ट. त्याला फिजीक्स कळायचं म्हणून तो काहीपण बनवू शकायचा. दुसरा होता जॉन बर्डीन - हा म्हणजे त्यांच्या काळाचा शेल्डन कूपर. थिअरॉटिकल फिजीसीस्ट. हा पंधराव्या वर्षीच कॉलेजमध्ये पोचलेला. आणि तिसरा विल्यम शॉकली. कमालीचा स्पर्धा वृत्ती असलेला वैज्ञानिक आणि तिघांच्यातला सगळ्यात धाकटा. पण धाकटा असला तरी शॉकलीने या टीम मध्ये यायच्या आधीपासूनच ट्रान्सिस्टरचा एक ढोबळ स्वरूपाचा आराखडा बनवलेला. हा ट्रान्सिस्टर बनवून आपण दुनियामें फेमस होणार असं शॉकलीचं स्वप्न होतं. पण त्याची कल्पना कागदावर जरी सॉलिड असली, तरी प्रत्यक्षात अजिबातच जमत नव्हती. शॉकलीचा हा आराखडा या त्रिकुटासाठी सुरुवात बनला.
.
काही काळानंतर, रक्त तरुण सळसळणारं म्हणत, शॉकली स्वतः वेगळं काम करायला लागला. म्हणाला मी अजून अलग नजरीयाने बघतो. इकडे ब्रॅटन आणि बर्डीन दोघे मिळून त्यांच्या पद्धतीने काम करतच होते. अधे मध्ये तिघे एकत्र यायचे. पण परत आपापल्या मार्गी जायचे. एक वर्ष गेलं तरी दाखवण्यासारखी प्रगती कोणाचीही नव्हती. आणि मग एके दिवशी, नसत्या उचापती करताना बर्डीनला युरेका मोमेन्ट मिळाली. त्यानं सगळं उपकरण काहीही कारण नसताना पाण्यात बुडवलं आणि अनपेक्षित रीत्या बरेच बरे परीणाम दिसले. पाण्यामुळे हे असं का झालं? हे शोधता शोधता ब्रॅटन आणि बर्डीन ला चक्क प्रत्यक्षात काम करणारा खरा खुरा पहिला ट्रांसिस्टर बनवायची युक्ती सापडली. आणि त्यांनी तो बनवला सुद्धा.
.
खुश होऊन त्यांनी आपला यार शॉकलीला फोन केला. पण मग "क्या सोचे थे? गब्बर खुस होगा? साबासी देगा?" वाली मोमेन्ट आली. शॉकली खुश झाला झाला म्हणेपर्यंत नंतर चिडला सुद्धा. कारण एकच... ट्रान्सिस्टरच्या शोधामध्ये शॉकलीला फेमस व्हायचं होतं की नै? पण आता त्याचं नाव पण लागणार नव्हतं असं त्याला वाटलं! या चिडचिडीमध्ये, सगळ्यांना सोडून शॉकली पुढे मग आपल्याच वनवास गेला. आपल्या आपल्या मठीत त्यानं काम सुरु ठेवलंच. आता बाजूला अमर अकबर.... आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अँथनी.
.
ब्रॅटन आणि बर्डीन ने बनवलेलं ट्रान्सिस्टरवालं उपकरण काम जरी करत असलं तरी ते बाहेरच्या जगात वापरण्यासाठी अजून योग्य नव्हतं. त्यात अजूनही खूप सुधारणा अपेक्षित होत्या. इथे शॉकली बाबाला संधी दिसली. त्याने त्याच्या पद्धतीने उत्तम सुधारणा केल्या आणि थेट बेल लॅबच्या वकिलांना गाठलं. म्हणाला, माझा शोध, माझी अक्कल. माझ्या नावावर पेटंट काढा. त्यात ना ब्रॅटन ना बर्डीन!
.
ब्रॅटन आणि बर्डीनला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांना मेरे साथ धोका हुआ है वाला फिल आला. तीन उत्तम आणि तल्लख बुद्धीच्या लोकांनी एकत्र येऊन भारी काहीतरी बनवलं खरं, पण नंतर आपसात खूपच राडा केला. तिघांच्या घाऊक गोंधळात, इकडे वकिलांनी वेगळीच कलाटणी दिली. त्यांनी कागदपत्रं तयार केली, त्याचा अभ्यास केल्यावर असं ठरवलं की या शोधावर खरं तर ब्रॅटन आणि बर्डीन यांचं नाव हवं. हे शॉकली साठी शॉकींग होतं!
.
अशा वेळी न कॉर्पोरेट कल्चर उत्तम असतं. त्यात कसला ड्रामा नसतो की भावना नसते. इकडे हे दिल आणि दर्द घेऊन बसलेले तिघे. आणि तिकडे "ट्रान्सिस्टर बनवायला जमलंय" हे एका कार्यक्रमात जाहीर पण करायला सज्ज झालेली AT&T. १९४८ ला हा कार्यक्रम झाला. एवढंच नाही, तर ब्रॅटन, बर्डीन आणि शॉकलीला एकत्र येऊन फोटो काढायला लावला. हा इथे दिलेला फोटो तोच तो. हा खूप ऐतिहासिक फोटो आहे. याच्या मागेही छोटी गोष्ट आहे की कसं शॉकली फोटो काढायच्या वेळी अचानक मधोमध येऊन बसला आणि भाव खाऊन गेला. वगैरे वगैरे.
.
***************************
एपिलोग:
ट्रांसिस्टर लै भारी हे आपल्याला आत्ता माहिती आहे म्हणून तेव्हाच्या या घटनेचं कौतुक. पण तेव्हा लोकांना अजूनही व्हॅक्युम ट्यूबमधेच जास्ती स्वारस्य वाटत होतं. टच स्क्रीन आला आणि तरीही लोकं बटणाचे फोन वापरायचे न? तसं. पण तेव्हा जपानमधल्या दोन इंजिनिअरना या शोधाचा पत्ता लागला. मॅगझीन वाचायचे हो. बॉम्ब मुळे देश उध्वस्त झालेला. त्याची नवी बांधणी सुरू होती. लोक नवनवी शक्कल लढवत होती. त्यात या दोघांना या छोट्या ट्रान्सिस्टरचं अप्रूप वाटलं. त्यांनी ट्रांसिस्टर वापरून छोटा, खिशात मावेल असा रेडीओ बनवला. रेडिओचं नाव नंतर ट्रान्सिस्टर असच पडलं.
आणि ही जी स्टार्टअप होती.. ती म्हणजे अर्थातच... सोनी.
.
इकडे ब्रॅटन, बर्डीन आणि शॉकली यांनी आपापल्या वाटा वेगळ्या केलेल्या. १९५१ ला बर्डीन ने बेल लॅब्स मधून टाटा बाय बाय केलं. शॉकलीची खडूस कीर्ती इतकी पसरली की त्याला बेल लॅब काय पण एकूणच ईस्ट कोस्ट वर कोणी काम करायला पार्टनर सापडेना.
.
पण फेमस होण्याचं स्वप्न अजूनही बाकी होतं. त्यानं इंटिग्रेटेड सर्किट बनवण्यासाठी आपली नवी कंपनी सुरु करायचं ठरवलं. या वेळी शॉकलीने आपला गाशा गुंडाळला, आणि तो वेस्ट कोस्ट वर पोचला. तिथे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी नव्या कंपनीना स्वस्तात जागा देत होती. तिथं शॉकलीला कोणी ओळखत सुद्धा नव्हतं. मग आपल्या चार्मने त्याने आठ उत्तमातले उत्तम इंजिनिअर शोधले... आणि त्यांना शॉकलीच्या भूतकाळाची कल्पना नसल्यामुळे, त्यांनीही भुलून बिनदिक्कत त्यात उडी मारली. पण या आठ जणांचा "भारावून जाणं" आणि नंतर "ये क्या कर दिया यार" म्हणाण्यापर्यंतचा प्रवास खूपच लवकर संपला
.
शॉकलीला काहीही म्हणा, पण त्यानं तयार केलेल्या सुरुवातीच्या आरखड्याचं महत्त्व कमी होत नाही. ब्रॅटन आणि बर्डीनने केलेले परिश्रम आणि त्यांना मिळालेलं यश, हे सुद्धा कमी मोलाचं होत नाही. ट्रांसिस्टरमुळे इलेक्ट्रॉनिक्स जगतात जी क्रांती झाली ती तर आता कायच सांगा!
या सगळ्याची नोंद घेत, १९५६ मध्ये, या तिघाही जणांना नोबेल पारीतोषक देण्यात आलं.
.
तळटीप: जॉन बर्डीनला नंतर १९७२ मध्ये दुसरं नोबेल सुद्धा मिळालं... सुपर कंडक्टीवीटी साठी.
.
ता.क. बरेच संदर्भ AT&T Tech channel मधले आहेत, बाकी विकीपीडिया आहेच, आणि "न्यू थिंकिंग" मधले बरेच संदर्भ. फोटो अमर अकबर अँथनी चा. 😛 आणि डावीकडे उभा असलेला मर्विन केली.

Sunday, March 26, 2023

कुछ नया करते है - भाग १: कोणी वाफ दवडेल का वाफ

स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वाझनियाक यांच्या जोडगोळीबद्दल कितींदा ऐकलंय. एकाला तंत्रज्ञान माहिती होतं, एकाला बिझनेस कळत होता. आणि मग नंतर त्यांनी सगळं जगच बदलून टाकलं. नै का? हे असं सांगितल्यावर, मला एकाने अडीच - तीनशे वर्षांपूर्वीच्या एका स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वाझनियाक जोडीबद्दल सांगितलं. त्यांनीसुद्धा असंच जग कायमचं बदलून टाकलेलं!
.
गोष्टीची सुरुवात करू पाण्यानं भरलेल्या कोळश्याच्या खाणींनी. काल १७०० चा. आत्ताच्या इंग्लंड प्रमाणेच तेव्हाच्या इंग्लंडमध्येही बीन बादल बरसात हा भाग नवीन नव्हता. अशा पावसात एकदा पाणी खाणींच्या आतमध्ये शिरलं, की खाणींची वाट लागलीच. मग केवळ खाणीतून पाणी काढायला म्हणून लोकांची कुमक पाठवायला लागे. ही सगळी किरकिर सहाजिकच त्रासदायक होती. मग इथे एकाने शक्कल लढवली. पाणी गरम झालं की त्याची वाफ होते आणि ती वाफ वाटेत जे येईल त्याला ढकलत वरच्या दिशेने जाते, हे तोवर ज्ञात होतं. तर मग या बाबाने हे वाफेचं तत्व वापरून पहिलं वाफेचं इंजिन बनवलं. या इंजिनमुळे खाणीतून पाणी काढायला आता लोकांची गरज नव्हती. किरकिर कमी झाली उत्पादन वाढलं.
.
कोण हा बाबा? ऑफ कोर्स, हा म्हणजे जेम्स वॉट नाही.
तर याचं नाव होतं थॉमस न्यूकोमेन. ऍगाथा ख्रिस्तीचा गाववाला. डेवनच्या डार्टमाऊथ मधला.
.
न्यूकोमेन इंजिनमुळे इतका फायदा जरी होत असला, तरी इंजिन खूप कोळसा खायचं. म्हणजे, एकूणच खर्चिक काम होतं. पण तरीही काहीही म्हणा, एक पाया रचला गेला होता. आता मिळालेला मार्ग जास्ती सुकर कसा करायचा, हे कोणीतरी शोधणं बाकी होतं.
.
तर... ही गोष्ट १७१२ ची. पाहिलं सो कॉल्ड वाफेचं इंजिन बनलं तेव्हाची.
पण इथे संपत नाही गोष्ट.
.
यानंतर पन्नास वर्षांनी अजून एका बाबाला ट्यूब पेटली. हा बाबा होता ग्लासगो युनिव्हर्सिटी मध्ये. हे म्हणजे आता आपण दक्षिणेकडून थेट इंग्लंडच्या उत्तरेकडे स्कॉटलँड कडे जाऊ. हा बाबा टेलेस्कोप आणि इतर उपकरणाच्या विविध भागांचं नेमकं कॅलिब्रेशन करायला शिकण्यासाठी तिथे आलेला. लहानपणी त्याला शाळेत मंद म्हणायचे. पण त्याला अभियांत्रिकीमध्ये खूप रस. बाकी विषयामध्ये खड्डा! ग्लासगो युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा त्याने बरीच उपकरणं बनवलेली. याला न्यूकोमेन इंजिन दुरुस्त करायचं काम एकदा दिलेलं. आणि मग रेस्ट इज हिस्टरी.
कोण हा बाबा? ऑफ कोर्स, हा आपला जेम्स वॉट.
.
जेम्स वॉटला एकूणच वाफेचे इंजिन या प्रकारात खूप रस आला. आणि मग आज कुछ तूफानी करते है म्हणत, त्याने न्यूकोमेन इंजिनमध्ये सुधारणा करायचं ठरवलं. आणि केल्यासुद्धा.
आता जास्ती तांत्रिक गोष्टींमध्ये न पडता, थोडक्यात सांगायचं झालं तर जेम्सने केलेल्या सुधारणांमुळे नव्या इंजिनला ७५ टक्के कमी इंधन लागणार होतं. आणि काम सरस.
.
आता इथे एंट्री होते बिझनेसचं डोकं असलेल्या मॅथ्यू बुलटोनची. जेम्स आणि मॅथ्यूने इथून पुढे जो काही कल्ला केला, तो मग सगळ्याच उद्योगधंद्यावर आपली छाप सोडून गेला. खाणकाम तर वेगाने सुरु झालच. दारू बनवणाऱ्या लोकांना पण ग्राइंडिंग साठी मदत झाली. जगाच्या इतिहासात प्रथम घाऊक प्रमाणात वस्तू बनू लागल्या. त्यामुळं नोकऱ्या वाढल्या. याच दरम्यान आणि याचसाठी खूप लोकांनी गावं आणि शेती सोडली आणि शहराकडे पलायन सुरु केलं (गांधींच्या पुस्तकात या इंग्लंडमधल्या शेती आणि गाव सोडून शहराकडे झालेल्या स्थलांतरावर टीका केलेली आढळते. गांधींच्या मते यामुळे गावांचा विकास खुंटला. हे असं इंग्रज भारतात पण करतील आणि त्यामुळं मूठभरच शहरात विकास होईल आणि लाखोच्या लाखो गावं त्यापासून वंचित राहतील असं त्यांना वाटायचं. आणि त्यामुळं भारतासारख्या देशात असलेलं गावांचं सौंदर्य आणि विविधता नष्ट होईल अशी त्यांना भीती होती. असो. तो विषय वेगळा. इंग्लंड मध्ये तर हे व्हायला सुरू झालं.).
.
या वाफेच्या इंजिनाने वाहतूक सुधारली. १८०० च्या पहिल्या दशकात सर्व प्रथम मनुष्यबळ किंवा प्राणी-बळ न वापरता, सुमारे २५ टन माल एकीकडून दुसरीकडे नेण्यात आला. तेही तब्बल ताशी ८ किलोमीटर वेगाने! लो कर लो बात. ही त्या काळासाठी खुप अभूतपूर्व गोष्ट होती. नव्या युगाची सुरुवात होत होती. अशी पण एक गोष्ट आहे की हे जे गाडीत वापरलं ते (लोकोमोटिव) इंजिन, त्याची कल्पना ना जेम्स ची ना मॅथ्यू ची. पण त्यांच्या कंपनी मधल्या विल्यम मरडॉकची होती म्हणे. असो आता. होती यांच्यातल्या एकाची. पण यांनी या तंत्राचं पेटंट बनवलं होतं आणि त्यामुळे १८०० पर्यंत इतर कोणालाही या इंजिनला हात लावता येणार नव्हता! कर दी न स्टीव जॉब्स टाइप बात! पण १८०० ला पेटंट संपलं आणि सगळ्यांनीच ही अशी वाफ दवडायला सुरु केली!
.
काही वर्षात हे तंत्रज्ञान अमेरीकेत पोचलं आणि वेगळाच कल्ला झाला. १८६० च्या दशकात अमेरीकेत थिओडर जुडाह नावाच्या सिव्हिल इंजिनिअरने पूर्व किनारपट्टीपासून ते पश्चिम किनारपट्टीपर्यंत रेल्वे नेण्याचं स्वप्न बघितलं. याच वेळी तेव्हाच्या काँग्रेसला सुद्धा असंच काहीतरी करायचं होतं पण त्यांना कुठून कुठे गाडी पळावयाची हे ठरत नव्हतं. जुडाहने इथे एंट्री मारली. परफेक्ट मार्ग निवडला. युनिअन पॅसिफिक नावाच्या कंपनीला पूर्वेकडचं आणि सेंट्रल पॅसिफिक नावाच्या कंपनीला पश्चिमेकडचं काम सोपवलं. या दोनीही कंपनींनी सहा वर्षं काम करून शेवटी युटाह मध्ये एकमेकाला आपापले स्टीलचे रेलवे ट्रॅक जोडले. हा होता पहिला ट्रान्स कॉन्टिनेन्टल रेल रोड. यामध्ये कॅलिफोर्निया बाकीच्या जगाशी जोडलं गेलं. तेच ते आपलं बे एरिया.
.
देख रहे हो... एका वाफेच्या इंजिनामुळे केवढ्या केवढ्या क्षेत्रात आणि केवढे परिणाम झाले? केवळ बोलटन आणि वॉट कंपनीमुळेच नाही, पण त्या नंतर इतरांनी या इंजिनमध्ये केलेल्या सुधारणांमुळे आणि त्या कार्यक्षम पद्धतीने वापरल्यामुळे, जगभर "औद्योगिक क्रांती" ची पायाभरणी झाली.
.
.
ता.क. न्यू थिंकिंग नावाचं एक पुस्तक काही वर्षापूर्वी वाचलेलं. त्यातले खूप संदर्भ वर वापरलेत. बाकी फोटो बर्मिंगहॅम मधला गुगल बाबाने शोधून दिला. हे जेम्स, मॅथ्यू आणि विलियम. आणि वेगळा दिसतोय फोटो तो थॉमस न्युकोमेन.

Saturday, March 04, 2023

भाग २: मी आणि मे

 

"सुंदर ते ध्यान ... उभे वीटेवरी वीटेवरी वीटेवरी!" हे जे होतं... त्याचा खरा अर्थ काय होता माहितीये? मला वाटतंय की कवीला म्हणायचं होतं की, उभ्या उभ्या केलेलं मेडीटेशन सुद्धा तितकंच सही होऊ शकतं. लोकं मुंबईच्या लोकलमध्ये उभ्या उभ्या डुलकी नाही काढत? तसंच. असो... विनोद बाजूला ठेवू... पण मुद्दा असा की, शेवटी मेडीटेशन म्हणजे मनाचा खेळ. जिथे मांडता आला तिथे मांडावा. मला तो गेल्या एका रविवारी खूपच सॉलिड जमला. मी अचानक चक्क सव्वा दोन तास, सलग एकाच ठिकाणी ध्यान लावून बसू शकलो. बॉर्डरमध्ये कसं तो एक पंटर सुट्टी मिळाली म्हणून गावभर बोंबलत सुटतो... तसं आता आपल्याला थोडंफार जमलंय तोवर खळखळाट फार करायच्या मूड मध्ये मी ही मेडीटेशन वरची ही दुसरी पोस्ट लिहिणार आहे. त्यामुळं चवीप्रमाणे मीठ ऍडजस्ट करून वाचावे. (पहिली पोस्ट, नसेल वाचली, तर विचारावं. लाजू नये)
.
बघायला गेलात तर, मेडिटेशनचे य प्रकार सापडतात. गुगल प्ले-स्टोअर किंवा तुमच्या आयफोन वर मेडीटेशनसाठी केवढ्या तरी ॲप आहेत! प्रत्येकाचं काहीतरी स्वतःचं असं वेगळेपण आहे. असायलाच हवं. नाहीतर माल विकला कसा जाणार? गली नुक्कड पे तर विचारूच नका. आणि तुम्ही परदेशी असाल तर तुम्हाला अजूनच फॅन्सी गोष्टी सापडतील. शेवटी काय हो? योगासेच होगा. आणि काय?
.
अशा या मेडीटेशनच्या गावोगावी लागलेल्या बुफे मधून आपल्याला जे आवडेल, जे रुचेल, जे जमेल ते आपण धरून ठेवावं. हे माझं सध्याचं लॉजिक आहे. कारण trust me, वो मेहरबान कल हो न हो असा सीन व्हायला वेळ लागत नाही! म्हणजे गरज असते तेव्हा अजिबात सुधरत नाही की या परिस्थिती मध्ये लागू पडेल असं मेडीटेशन कुठलं? मी वेगवेगळी मेडीटेशनं बघायची सुरुवात करायच्या खूप आधी, रॉकस्टारमध्ये खटारा भाई सांगतो न, तसं मला एका खटारा भाईने सांगितलेलं की, बाबो, मेडिटेशन लागू पडायला, दिलमें दर्द, लाईफमें प्रॉब्लेम आणि कुठेतरी काहीतरी अडकून पडलेली फिलिंग लागते - नाहीतर, हे असंच ब्रीद ईन, ब्रीद आऊट, करत बसशील आणि हाताशी काहीच लागणार नाही! ही गोष्ट २००४ ची. नाशिकमध्ये मिसळ पाव खाताना प्राणायाम म्हणजेच की मेडीटेशन असं शपथेवर सांगत या खटारा भाईने हे ज्ञान पाझळलेलं. इतक्या उत्स्फूर्त पहिल्या ओळखीनंतर आपण जे स्विच ऑफ झालो, तिथून स्विच ऑन होऊन ते मग आत्तापर्यंत येता येता पाच वेगवेगळी मेडिटेशनं सिरीयसली चाखून बघून झालीत. मुद्दा असा की, टाईम लगता है. आधी का करायचं हे समजायला आणि नंतर कसं करायचं हे जमायला.
.
या सगळ्या मेडीटेशनच्या बुफेमध्ये, ढोबळ मानाने सध्या तरी मला दोन प्रकारचे लोक सापडलेत. एक म्हणजे गायडेड मेडिटेशनच्या समोर रांगेत थांबलेले आणि दुसरे म्हणजे अन्-गायडेड मेडिटेशन करणारे. आपण दोनही रांगेत जाऊन आलोय. मेडिटेशन करताना स्वतःमध्ये आणि इतरांच्यामध्ये होणाऱ्या बदलांची, आपल्या प्रतिक्रियांची आणि प्रतिक्षिप्त क्रियांची जेवढी नोंद घेऊ शकू, तेवढं मेडिटेशनचं भारी गणित समजतं असं मला समजलंय. बाकी, साईडला बीबीसीवर डेव्हिड इगलमनची मेंदूवर असलेली डॉक्युमेंट्री पाहिलीय. लॉरी सॅंतोस ने बनवलेला "हॅपिनेस लॅब" हा पॉडकास्ट खूपवेळा ऐकलाय. हे सांगण्याचं कारण असं की मेडिटेशन हा प्रकार, "मेलडी खाओ, खुद जान जाओ" यातला जरी असला, तरी neuroscience संदर्भांत असलेलं साहित्य ऐकलं, वाचलं किंवा बघितलं तर मला वाटतं मेडीटेशनमध्ये जास्ती मजा येऊ शकते. मला तरी आली.
.
तर...
सुरुवातीला गायडेड आणि अन्-गायडेड वाला भाग सोडवू. गायडेड मेडीटेशन मध्ये कोणीतरी तुमच्या कानात कायम सांगत राहतं की आता काय करायचंय. कुठे बघायचंय. काय अपेक्षित आहे. वगैरे वगैरे वगैरे. अन्-गायडेड मध्ये ही मधली लुडबुड कमी असते. किंवा नसतेच. शेवटी मेडीटेशन म्हणजे काय हो? स्वतःसोबत बसायचंय. काही लोकांना जमतं असंच बसायला. काहींना कोणीतरी हात धरून लागतं बाजूला. हाच तो फरक. यातलं काहीतरी एक करून स्वतःबरोबर गप्पा मारत बसलाच पण मग बाकीचे खंडीभर विचार येऊन गोंधळ घालू लागले तर? बैठे बैठे क्या करे म्हणून काहीतरी डोक्यात येत राहतंच की. मग ते येऊ द्यावेत? की त्यांचं काही करायचं? की ठराविक विचारांना एंट्री द्यायची आणि ठराविक विचारांना नाही? हा एवढाच भाग असतो सहसा. तोच भाग वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. जेवणात नाही का ... कांदा टोमॅटो जीरे मोहरी हींग लसूण वगैरे गोष्टी त्याच की. तरी वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या आमट्या आणि वरण बनवतातच की. नाही का? तसंच ते.
.
मला स्वतःला अन्-गायडेड मेडीटेशन फारसा झेपलं नाही. मी इतका भरकटत गेलो की शेवटी काही सुधरेना. कदाचित थोडा सराव झाला आणि हे प्रकरण कशाशी खातात हे समजलं, की मग हुकमी अन्-गायडेड मेडीटेशन जमेल आपल्याला, असं ठरवून सध्या तरी गच्छन्ति केलेली आहे.
.
गायडेड मेडीटेशन माझ्या सारख्या थिरथिऱ्या मनाला जास्ती झेपलं. कारण यामध्ये हात धरून चालायला शिकवतात न, असा फील असतो. यामध्ये नमूद करावी अशी म्हणजे मला जमलेली अशी तीन लोकांची मेडीटेशनं - एक सद्गुरू जग्गी वासुदेवनी सांगितलेलं ईशा क्रिया, दुसरं म्हणजे डॉ. जो डिस्पेंझाने सांगितलेलं मॉर्निंग आणि इव्हिनिंग मेडीटेशन, आणि तिसरं म्हणजे सॅम हॅरिसने सांगितलेलं वेकींग अप. तसं मी Calm आणि हेडस्पेस पण वापरून बघितलंय.
.
कसंय न, अगदी सुरुवातीला, मी जेव्हा माझ्या सर्वात खाजगी गोष्टींबद्दल विचार करणार आहे, तेव्हा थेट माझ्या कानात कोणीतरी काहीतरी बोलणारे आणि त्याचा माझ्यावर किंवा माझ्या विचारांवर खोलवर परीणाम होऊ शकणार आहे, ही कल्पनाच मला प्रचंड privacy encroaching वाटलेली. माझ्या आयुष्यातल्या भल्या बुऱ्या गोष्टींचं गाठोडं असं का त्रयस्थासमोर मी का उघडावं? Even your fears are dear to you, aren't they? आणि या अशा काहीशा अवघडलेल्या विचारामुळे सुरुवातीला खूप मर्यादा पडल्या. वेळ द्यावा लागला. त्यावेळी मी Calm आणि हेडस्पेस नावाची दोन भिन्न ॲप वापरून बघत होतो. त्या मध्ये ज्या व्यक्तीचा आवाज मी ऐकत होतो त्या व्यक्तीबद्दल मला खूपच कमी किंवा काहीच माहिती नव्हतं. मी सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला नव्हता. मग ते फारसं प्रभावी नाही झालं. यांत्रिकी पद्धतीनं केलं. फायदा नक्की झाला. नाही असं नाही. पण परत तिकडे जावं असं अंदरसे आलं नाही. गट्टी जमली नाही. छान होतं पण अनोळखी वाटत राहिलं. मला वाटतंय की शिकण्यातला हा ही एक भागच की.
.
या उलट मी सद्गुरू जग्गी वासुदेवनी केलेली युथ अँड ट्रुथ वाली पुष्कळ व्याख्यानं ऐकलेली. किंवा डॉ. जो डिस्पेंझाचं मनावर ताबा आणण्याबद्दलचं किंवा मेंदूमध्ये रीवायरींग कारण्याबद्दलचे विचार ऐकलेले. त्याची लांबून का होईना, पण डेव्हिड इगलमनच्या मेंदूच्या डॉक्युमेंटरीशी सांगड लागत होती. तसंच मी सॅम हॅरिसची बरीच डिबेट्स बघितलेली होती. त्यामुळे या तिघांच्या बाबतीत थोडा कंफर्ट तयार झालेला होता. मला वाटतंय, म्हणून मला या तिघांचीही मेडिटेशनं थोडी फार जमायला लागू शकली असावीत. तिघांचे मेडीटेशनबद्दलचे दृष्टिकोन खूप वेगळे आहे. ते आता एक एक करून सांगेनच. तिघांच्या पैकी सद्गुरू आणि डिस्पेंझा या दोघांच्याही बाबतीत मला बाकीचे बरेच प्रश्न आणि प्रॉब्लेम्स पडत गेले. त्यामुळं आमचं love - hate पद्धतीचं नातं सुरु राहीलं. पण मग मेसेंजर आवडला नाही म्हणून मेसेजकडे दुर्लक्ष थोडीच करणार? त्यामुळे निमूटपणे मुकाट्याने परत परत या मेडिटेशन कडे येणं झालंच. काहीवेळा नाकापर्यंत पाणी आलं की, प्रश्न बाजूला ठेवणे महत्वाचे. नै का? दुसऱ्या महायुद्धातल्या "shut-up and calculate" म्हणायचे, त्या बद्दल वाचलंय का? खूप इंटरेस्टींग गोष्ट आहे ती पण. पण थोडक्यात अशी की, "It works. So keep your questions for leisure time. And right now... just shut up and calculate! Because it works."
.
आता पाहिलं उदाहरण घेऊ सद्गुरूनी सांगितलेल्या ईशा क्रियाचं. सद्गुरूनी अपलोड केलेले व्हिडीओ बघितले असले तर त्यात, "स्व" कसा आपल्या शरीराच्या आणि मानाच्यापण पलीकडचा आहे, यावर केलेली चर्चा आढळते. हा एकच विषय, वेगवेगळ्या विषयांतून आणि वेगवेगळ्या प्रश्नोत्तरातून परत परत मांडला गेलेला आहे. ते समजायला लागलं असेल तर मग पुढे ईशा क्रिया करताना, जेव्हा I am not the body, I am not even the mind हे कानावर पडतं, ते खूप आतपर्यंत जाऊन पोहचू शकतं. आपल्याला सध्या पडलेले प्रश्न, होणारा त्रास, जखडलेली अवस्था यातलं काहीही असलं तरी ते या बॉडी आणि माईंड मधेच आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला या दोन्हीच्या पलीकडे वास्तव्य करू देता, तेव्हा लिबरेटिंग वाटतं. आपणच आपल्याला आपल्या त्रासातून मुक्त केल्यासारखं वाटतं. मग दुसऱ्या कोणावर ना काही अवलंबून राहतं किंवा ना कोणावर काहीही राग किंवा आढी राहते. किंबहुना मला तर जास्तीच इम्फाथॅटिक वाटायला लागायचं ईशा क्रिया केल्यानंतर.
.
पण मजा काय झाली... (आणि हे ही कळायला मला खूप काळ जावा लागला...) की हे मेडीटेशन केल्यावर मी जरा जास्तीच रिलॅक्स व्हायचो. म्हणजे, एक अलगही लेव्हलका टॉलरन्स यायचा. आयुष्याची वाट लागलीय... आता उठलं पाहिजे... काहीतरी बूड हलवलं पाहिजे... हे असं असताना मला... ठीक ही है न... वाट लागली तर लागली... कोई नई... तू रहा चिल् मध्ये... असा एक विचित्र acceptance यायला लागला. आपण भर कुरुक्षेत्राच्यामध्ये येऊन शस्त्र टाकून मांडी ठोकून बसून जायचो. इथून पळून पण जाणार नाहीए आणि लढणार पण नाहीए. हा जरा नकोसा आणि अनपेक्षित परीणाम होता माझ्यासाठी. हे जेव्हा जाणवलं, तिथे थोडा स्वल्पविराम घेतला मग मी.
.
सद्गुरुंच म्हणणं असं आहे की आपण कोण ठरवणार आपल्याला काय हवं? कसं हवं? किती हवं? कारण आपल्या अपेक्षा आणि त्यांची व्याख्या, आपल्याला आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांनी सीमित आहे. आपण अपेक्षा करून करून ते केवढी मोठी करणार? त्यापेक्षा, he in a way discourages you from defining anything for yourself but claims to be preparing you for embracing something grander which may come your way. यामुळं हे अपेक्षा आणि इच्छा करण्याच्या एका कामातून अचानक सुट्टी झाल्याचा फील पण आला मला.
.
It helped me to let go of many many things. Many unpleasant situations, guilt, aspirations and what not. I am sure, this meditation may have different effects on different people. My experience need not be प्रमाण. आणि आपलं उथळ पाणी आहेच सध्या.
So... it's a learning... आणि work in progress. हे नमूद करणं महत्वाचं.
मला वाटतं की एकटं एकटं मेडीटेशन करू नये. बोलावं. आपल्या जवळच्या लोकांशी तरी बोलावं. म्हणजे, थोड्या गोष्टी बऱ्या समजू शकतात.
.
मी अजूनही अधे मध्ये करतो ईशा क्रिया. It still works. But now I know the effect that it can have on me with prolonged use. त्यामुळं त्याचं एक सेटिंग समजलंय... त्या सेटिंग मध्ये गेलो, किंवा जायचं असेल, तेव्हा मी हे करतो. And at times, it gets me to somewhere entirely different place.
.
तर... that's that.
.
इथे एंट्री झाली डॉ. डिस्पेंझाची. या बाबाने दिलेला गांजा ओढल्यामुळे I almost lost one of my dear friends अशी माझी अजूनही समजूत आहे. पण तो विषयच वेगळा.
गांजा म्हणजे, अर्थात गांजा नाही. मेडीटेशनच की. अजून काय?
पण त्या बद्दल पुढच्या भागात.

Sunday, February 12, 2023

भाग १: तो सध्या काय करतो?



तो आजकाल माझ्यासोबत वेळ घालवायचा प्रयत्न करतो. स्वतःहून येतो. बसतो. फोन सायलेंट वर टाकतो. कधी कधी फोन न घेता येतो. बहुतेक वेळा आम्ही एकमेकांसोबत "क्वालिटी टाईम" घालवतो. पण दरवेळी जमतंच असं नाही. कधी कधी आमच्यात ऑकवर्ड सायलेन्स असतो. कधी विषय सुचत नाहीत. कधी चटकन निघायची घाई असते. "बाहेरच्या जगातलं काहीही तुझ्याईतकं महत्त्वाचं नाही" असं म्हणतो खरं. आणि काही क्षणात बाहेरच्या जगात विलीन व्हायला निघून पण जातो. कधी कधी स्वतःच्या अशा वागण्यावर खट्टू होतो. पण सॉरी म्हणायच्या भानगडीत पडत नाही. तसा रीवज नाही आमच्यात. "माझा हट्ट नाही आहे. जमेल तसं ये. नाही जमलं तर राहू दे. त्रास करून यायचं असेल तर it defeats the purpose. नाही का?" असं सांगितलं तरी पुरत नाही. "It's not always about you... It's for me." असं त्याचं उत्तर तयार असतं. कधी कधी बरेच दिवस आमची गाठ पडत नाही. अशा बऱ्याच काळानंतर एकदा आला की मग उधारीच्या गील्टचा निचरा करण्यात वेळ घालवतो आणि मोकळा होऊन परत जातो.
.
तो जसा होता तसाच unpredictable आहे. बाहेरच्या जगात असला काय नी माझ्यासोबत असला काय. आला की बहुदा खुश असतो. माहिती होतं कसं यायचं ते, पण तरीही वेळ लागला, म्हणतो. मग "इथेच का राहत नाहीस?" विचारलं तर त्याला उत्तरही सापडत नाही. म्हणतो की "बाहेरच्या जगाचं व्यसन लागलंय. सोडायचंय पण सुटत नाही." आज काल आला की स्वतःबद्दल खूप काही सांगत बसतो. मोठ्या मोठ्या गोष्टींचा निचरा बाहेर होत असेल. छोट्यातल्या छोट्या गोष्टी घेऊन माझ्याकडे येतो. फलाटावर दिसलेल्या जाहिराती, स्टेशनची मजेशीर नावं, कारण नसताना सुचलेले पुचाट विनोद, डोक्यात अडकलेलं गाणं, शंतीत सुचलेले क्रांतिकारी विचार, जमलेल्या न जमलेल्या गोष्टी, आळस, आठवणी, साठवणी असं सगळं गाठोडं, हळू हळू उघडं करतो. तसाच पसारा ठेवून निघून जातो. जेव्हा परत येतो तेव्हा चाचपून बघतो की मागच्या वेळी सांडलेलं अजून काही राहिलंय का?
.
आम्ही सहसा घरीच भेटतो. पण कधी बस मध्ये, ट्रेन मध्ये सुद्धा भेटतो. आम्ही ग्रीस मध्ये भेटलोय, जर्मनी मध्ये भेटलोय, इंग्लंड मध्ये भेटलोय, आणि भारतात तर भेटलोच भेटलोय. हर ठिकाणची भेट वेगवेगळी. वेगवेगळ्या काळानुसार, वेगवेगळ्या वळणांची. मी कायम इथेच आहे. तो मात्र कधी येतो, कधी येत नाही. आपले आपले ठोकताळे लावतो. कुठे पडला, कुठं लागलं, कोणी कौतुक केलं, कोणी बक्षीस दिलं, सगळं सांगतो. "असच बाहेर पण घडाघडा बोलत जा म्हणजे साचून राहणार नाही!" असं म्हणलं तर मला उलट म्हणतो की, "मन नाही करत बाहेर. बाहेर सांगितलं तर कदाचित समोरच्याच्या प्रतिक्रियेचं मिंधं राहावं लागेल. आणि एखाद्या आवडीच्या कोणी हवी ती प्रतिक्रिया नाही दिली तर? त्यापेक्षा इथं मला तुझ्याकडून गॅरंटी आहे. इथे सेफ वाटतं."
.
आमच्यातल्या संवाद जोर धरू लागला की त्याला फोनची, लॅपटॉपची, स्पीकरची, हेडफोन्सची, सगळ्याची अडचण व्हायला लागते. दर वेळी आम्ही बोलातोच असं नाही. पण आम्ही असतो. काही न बोलताही. किंवा काहीतरी बोलत. मग कधी राजकारण काढतो, कधी विज्ञान काढतो, कधी इतिहास काढतो. एकूण काय तर खयाली पक्वांनांची रेलचेल सुरू ठेवतो. आम्ही एकत्र असताना केवढे केवढे सीन माझ्यासमोर जिवंत घडवलेत की काय सांगावं? ते सगळे सीन, त्याच्या सगळ्या सग्या सोयाऱ्यांच्या बरोबर खरोखर घडले, बिघडले किंवा नाही जरी घडले तरी आता काही हरकत नाही अशा तत्वावर येतो. कधी कधी स्वतःच किती बोअरींग आहे पासून, स्वतःच किती रॉकस्टार आहे पर्यंत सहज उडी मारतो. आम्ही एकत्र असलो की ना उंचीची भीती. ना खोलीची. कुठेही वाहवत गेला तरी स्थिर असतो.
.
आमचं नातं कायम असं कधीच नव्हतं. आम्ही असायचो एकमेकाच्या आजूबाजूला पण एकमेकाची दखल घ्यायला खूपच उशीर झाला. गरज नव्हती कदाचित. आम्ही आहोत आजूबाजूला, हे एवढं त्याच्यासाठी काफी था... आता तसं राहिलं नाही. मला वाटतंय, खूप लहान असताना आपण कळत नकळत सगळ्यांवर प्रेम करतो. मोठं झालं की चॉईस येतात, जजमेंट येतात. मग आहे ते नकोय, आणि नकोय ते हवंय हा प्रकार सुरू होतो. त्याने शाळा कॉलेजमधून साठवलेल्या आठवणी आणि जमवलेले लोक पुष्कळ होते. त्याला माझी काय गरज? किंबहुना या सगळ्या पसाऱ्यात मी म्हणजे distraction च न? आमच्यात संवाद खूप उशिरा घडला. आपण एकमेकाच्या सोबत असणार आहोत हे समजायला वेळ गेला. आता कसं एकमेकांसोबत वावरायचं हे एवढंच फिगर आऊट करणं सुरू आहे.
.
नाव काय देशील आपल्याबद्दल लिहिलंस तर? यावर त्याचं सध्याचं लेटेस्ट म्हणणं आहे...
"There's nothing like doing nothing with you"

************
.
Epilogue:
माझ्यासाठी मेडीटेशन हा जरा भारी पण न जमलेला प्रकार आहे. पण आज जरा पेशल आहे म्हणून हे सारं. मेडीटेशनमध्ये किंवा मेडीटेशनमुळे एक्झॅक्टली काय होतं? याचा शोध किंवा याचा खुलासा असं दोन्हीही इथे करायचं नाही आहे. पण मेडीटेशन करताना मला कसे अनुभव आले हे लिहायची जोरात खुमखुमी आलीय. म्हणजे ही खुमखुमी खूपच वर्षांपासून आहे पण धाडस झालेलं नव्हतं. आधी जमायचं नाही म्हणून आणि मग थोडाफारच जमतंय म्हणून. नंतर खूप भारी आणि हुकुमी जमायला लागलं तर मग याबद्दल लिहिण्याची इच्छा निघून जाईल. म्हणजे ते असं होतं न की तुम्हाला वाटतं की अरे केवढी व्याप्ती आहे या विषयाची आणि मग आपल्या इवलूशा लिखाणात कुठे जमायचं काही?
सो...
सध्या एक छान मध्यंतर आहे... की जिथे माझ्या या उथळ पाण्याचा भारी खळखळाट सुरू आहे. मग मौका है... दस्तूर है... म्हणून हा घाट. अजून एक दोन सुद्धा लिहीन. पण तूर्तास हा पहिला भाग.
.
डोक्यातला चॅटर... सततची बडबड... स्वतःसोबत आणि जगासोबत सुरू असलेली झटापट यातून वाट काढता काढता मेडीटेशन हा प्रकार सापडला. बघता बघता त्यातून स्वतःबरोबर एक संवाद सुरू झाला. एक ओळखीचा व्यक्ती जो अनोळखी झालेला तो परत भेटला. असं काहीतरी. त्या व्यक्तीबरोबर आज सलग २ तासाहून जास्ती काळ काढला... हे आपलं सध्यापर्यंतचं पर्सनल बेस्ट टायमिंग आहे. म्हणजे १५ मिनिटं ते ३५ मिनिटं आपण नेकी मध्ये बऱ्याचदा केलेलं. पण काही दिवसांपासून जरा जास्ती होऊ शकेल असं वाटत होतं. आज फ्लाईट मध्ये ... चार चाँद लावूनच टाकले.
I don't know what it means. But I'm sure it is definitely worth exploring further. And I am sure it might still be insignificant also. कारण मुद्दा कायम वेगळाच असतो. नई का?


Sunday, November 20, 2022

देव म्हणजे काय रे भाऊ?

आज्जी कायम सांगायची, "अन्न हे पूर्णब्रह्म". ताटात वाढलेलं सगळं पुसून खा. अन्नाशी खेळ नको. असल्या गोष्टी आम्हाला समजाव्यात अशी तिची अपेक्षा असावी. पण आपलं डोकं, "आपण उपवास करतो तेव्हा नास्तिक असतो का?" असा आगाऊ प्रश्न विचारावा का... इकडं भटकत असायचं. देवळात भटजी लोकांचं पोट मोठं का असतं याचं उत्तरसुद्धा याचं उक्तीमध्ये दडलेले असावं असं मला राहून राहून वाटायचं. कोल्हापूरसारख्या धार्मिक ठिकाणी राहिल्यावर देवावर मत नसणं म्हणजे छे छे च न?


आता इथून पुढं काहीतरी देवाधर्माच्या संस्कारी गोष्टी लिहिलेल्या असतील असं वाटत असेल तर पुढे अगदीच वाचू नका. निष्काम माणसाच्या विसंगत विचारांत सुसूत्रता असल्याचा अप्रस्तुत दावा करण्याचा माझा हा विस्तृत प्रयत्न आहे. (अर्थातच निष्काम माणूस म्हणजे मी ... नाहीतर तो गैरसमज व्हायचा!)


तर...

तर आम्ही मोठं झाल्यावर, देवांवरच्या विविधावह मतांचे चहापोहे करून मन भरल्यावर, मानसिक आरोग्य, ध्यान लावणे (म्हणजेच प्राकृत मराठीमध्ये मेडीटेशन) या विषयांवर संवाद घडू लागल्यावर, मला देव हा विषय जरा विशेष वेगळ्या बाजूने दिसू लागला. देवाच्या सगळ्या इकोसिस्टीमकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. कुठेतरी हे दोन विषय एकमेकांशी सलग्न असणं निर्मात्याला अभिप्रेत असावं असं वाटलं.


वर्षागणिक द्विगुणित होणाऱ्या अगणित लोकांच्या बहुगुणी अज्ञानामुळे लोकांची मनं सैरभैर न होता त्यांनी आपापली छोटी छोटी आयुष्यं बरी काढावीत, हा बड्या बुजुर्ग लोकांचा हेतू असावा. पूर्वीच्या काळात लोकांना पाऊस का पडतो माहिती नव्हतं. आकाशात धूमकेतू का येतो माहिती नव्हतं. औषध पाण्याचा पत्ता नव्हता. रोगराईने शिट्ट्या वाजयच्या. कशाचंच काहीही आपल्याला सुधरत नाही असं वाटून डिप्रेशन येत असेलच की पब्लिकला. डिप्रेशन हा शब्द माहिती नसला म्हणून काय झालं? मग लोकांना शांत कसं करावं? त्यासाठी कुठं बरं लक्ष केंद्रित करायला सांगावं? लोकांनी कुठं बरं मन मोकळं करावं? तर ते ठिकाण म्हणून "देव" शोधला असावा. इथे या. बसा. शांत व्हा. मोठा श्वास घ्या. एकाग्र व्हा. वगैरे वगैरे. You know the drill. And I'm sure it must have been very effective. अपने जमाने में देव क्या स्टड हुआ करता था... असं इतिहासकार सांगत असतील तर त्यात नवल नाही.


"देव" म्हणजे प्राचीन काळातलं बेफाम वायरल झालेलं मेडीटेशनचं ऍप असावं. जगभर सगळेच एका ट्यून वर आपापली कला दाखवू लागले हो. आणि मग कोणाला किती लाइक्स याची शर्यत लागली. जगातलं पाहिलं टिकटॉक म्हणजे "देव" असावा. कास्ट-अवे मध्ये कसं व्हॉलीबॉलला विल्सन बनवून, चक् त्याच्यासोबत गूज करत राहतो, तशी आपण वेडं न होण्यासाठी बनवलेला व्हॉलीबॉल म्हणजे "देव" असावा. आता त्यामुळे आपण वेडे व्हायचे राहिलो का? हा प्रश्न वेगळा.


जर "अन्न हे पूर्णब्रह्म" असेल तर मग सध्याचे देव म्हणजे खूप पाणी घालून पातळ केलेली भाजी असावेत असं मज पामराचं मत आहे. बघा की... ही भाजी कशीही असली तरी पौष्टिकच आहे म्हणून शपथेवर सांगणारे लोक दिसतील. ही भाजी म्हणजेच एकमेव पौष्टिक पदार्थ असल्यामुळे, दिसेल त्याच्या घशात ढकलू पाहणारे लोक सापडतील. आता या भाजीत काही दम राहिला नाही म्हणून चिडचिड करणारे लोकही दिसतील. तुमच्या भाजीपेक्षा आमची भाजी सरस या विषयावर अडकलेले लोक दिसतील. दुसऱ्याच्या भाजीत कसं पाणी जास्ती आणि सत्व कमी आहे याची कुचेष्टा करणारे लोक दिसतील. भाजीच्या नावानं झालेली ही सगळी जत्रा बघून, मला भाजीच नको असं म्हणत फास्ट फूडच्या आहारी जाणारी एक वेगळी जमात सुद्धा निर्माण झालेली दिसेल. एकूण काय तर, दुसऱ्यांच्या रेसिपी मधलं कार्ब दिसतं पण स्वतःच्या भाजीतलं तेल दिसत नाही अशी आपल्या दैवी लोकांची परिस्थिती भाजी विना कशी समजावून सांगावी? म्हणूनच "अन्न हे पूर्णब्रह्म" असा क्लू जाणकारांनी पौरणात सोडला असावा.


खरं तर, जगण्यासाठी खावं हे लागणार आहेच, हा एवढाच मुद्दा असावा. मग त्यात कोणासाठी पालेभाजी, कोणासाठी फळभाजी. हे मान्य करायला काय हरकत आहे? पण या गोष्टीमध्ये भाजी विक्रेत्यांची आगाऊ जमात पण आहे. या लोकांची आपापली लॉबी बनलेली आहे. या जमातीची सुपर पॉवर म्हणजे, इतर लोकांनी भाज्या एकमेकांत मिसळल्या की यांच्या पोटात ऑटोमॅटिकली दुखायला लागतं. या लोकांना भाज्यांच्या नव्या रेसिपी काढता येत नाहीत. आणि म्हणून की काय एकच भाजी सगळ्या तमाम जनतेला पाणी घालून घालून घालून घालून वाढणं सुरू आहे, हे असं झालं असावं. पण मागवली काय म्हणतो, नळ दमयंती खायचे, म्हणून आम्हीही तेच जेवण जेवायचं? वरण भात भाजी चपाती नळ दमयंतीच्या नशिबी नव्हती यात आपली काय चूक?


अन्न हे पूर्ण ब्रह्म असलं तरी अन्न विकणारा अण्णा म्हणजे पूर्णब्रह्म नाही न? सशक्त राहायचं तर, निरोगी राहायचं तर वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या खायला हव्यात, विविध भाज्यांची सरमिसळ व्हायला हवी. भाज्या स्वतः स्वतः आपल्या आवडीनुसार निवडून, धुवून, चिरून, त्यावर संस्कार करता यायला हवेत. त्यासाठी वेळ काढला पाहिजे, राखून ठेवला पाहिजे. असं केलं नसतं तर आज आपल्याला ना वडा पाव मिळाला असता, ना पाव भाजी! मग हे असं न करून आपण देवा धर्मात होऊ शकणार असलेले केवढे नवे नवे प्रयोग आणि शोध मिस् केलेले असू बघा.


असो. भाज्या खा. नव्या रेसिपी शोधा. आणि खवय्ये व्हा.

आणि हो, दुनियामे जिनके और भी तरीके है गालिब... हे विसरू नका.

Saturday, October 22, 2022

माझं (पण) (शाकाहारी) खाद्य जीवन

माझा "तू भोसले म्हणजे चिकन मटण हाणतच असशील?" पासून "कोल्हापूरचा असून नॉन वेज खात नाहीस?" पर्यंतचा प्रवास अजिबात नाट्यमय नव्हता. पण तो नाट्यमय, क्रांतिकारी, जनहितकरी किंवा वैज्ञानिक असावा असं माझ्या जवळच्या जनतेला अजूनही वाटतं. किंवा त्यांना असं वाटत असावं असं मला वाटतं. आता तर मी शाकाहारी होऊन सुमारे बारा-तेरा वर्ष झालीत. तरीही "काय सांगतो?" "कधीपासून?" हे असले फुलटॉस अधून मधून सर्रास येत असतात. यावर कधीतरी "मेरे पास माँ है" सारखं लिजेंडरी उत्तर सापडवं अशी खूप वर्षं ईच्छा होती. और फिर एक दिन.........

और फिर एक दिन यंदा पुण्याहून परत येताना मला फ्लाईटमध्ये एक गोरा प्राणी भेटला. त्या बाबानं जेवायला विगन मागितलेलं. तसंही आजकाल इतकी गोरी लोकं स्वतःला विगन म्हणून आयडेंटीफाय करतात, की काय सांगू! कधी कधी मला वाटतं लवकरच LGBTQ सारखं Potato-Mushroom-Beetroot वरून PMB असं काहीतरी बनवून विगन लोकांसाठी सर्वनामं पण बनवतील. लंडन वगैरे सोडा, पण मला पोलंडमधल्या क्राकव सारख्या भागात सुद्धा खास फक्त विगन खाण्यापिण्याच्या जागा सापडलेल्या. पूर्वी नॉनव्हेज जगभर सर्वज्ञ आणि स्वाभाविक होतं. वेजीटेरीयन पामराला आपली ओळख करून देताना चिकन मटण नको, गाय बैल नको, मासे नको असा जो तो मी असं सांगावं लागायचं. त्यानंतर सुद्धा ताटात ऑक्टोपस आल्याच्या कथा आहेतच, कारण तुम्ही ऑक्टोपस नको असं थोडीच म्हणालेला? पण अहो, आता हे विगन लोक सहज समजलेत सगळ्यांना! म्हणजे वेजीटेरीयन माणसाचा आयडेंटिटी क्रायसिस गेलाला नाहीये तो नाहीच. आता आम्ही "विगन प्लस चीज किंवा डेअरी चालेल.", अशी ओळख करून देतो. तरीही "मग अंडी चालतील का?" असा कुत्सित प्रश्न कधी कधी वाट्याला येतोच तो भाग वेगळा. (कधी कधी मला वाटतं की हिंदू खतरे में हैं... मुसलमान खतरे में हैं... पेक्षा खरं तर वेजीटेरीयन जास्ती खतरे में हैं! असो) तर अशा आयडेंटिटी क्रायसिस ने ग्रासलेल्या माझ्या वेजीटेरीयन मनाला या गोऱ्या विगनला डिवचायची इच्छा न झाली तरच नवल. मी म्हणालो, "(गोरा म्हणजे बीफ आणि पोर्क हाणत असणार?) विगन? (असं काय झालं जिंदगी मे?) का म्हणे? जस्ट क्युरियस बर का! (काहीतरी मसालेदार, क्रांतिकारी, वैश्विक, सामाजिक आणि वैज्ञानिक सांग बघू) अजून काही नाही." आईस ब्रेकरच्या नावाखाली माझ्या वाट्याला आलेले तसले अजून चार स्टिरीओटाईप खोडसाळपणे खपवले. आता समोरच्याने आपल्या आपल्या श्रध्देनुसार बिटवीन दी लाईन्स वाचावं.

पण हा बाबा नास्तिक निघाला. त्याला श्रद्धा नव्हती. त्यानं मी दिलेला फुल टॉस झेलला आणि अलगद बाजूला ठेवला. त्यातून काहीच क्रांतिकारी, जनहितकारी किंवा गहन बाहेर पडलं नाही. तो म्हणाला, "मी विगन झालो कारण मी विगन झालो. That's it." आणि त्यानं परत जे खात होता ते खायला सुरू केलं. माझ्यासाठी ही युरेका मोमेंट होती. कारण यही जवाब तो मै इतने साल ढूंढ रहा था! डोक्यावरचं वजन गेल्यासारखं झालं. मी पण शाकाहारी झालो कारण मी शाकाहारी झालो. एवढंच तर होतं. आणि एवढंच तर असतं. कुठं "मेरे पास मां है" च्या शोधात गाव भटकत होतो! आपण थोडीच कोंबडीने आज्ज्याला चोच मारली म्हणून कोंबड्या खात सुटलोय? जस्ट... खातो म्हणून खातो. जस्ट लाईक दॅट. चव आवडते, रंग आवडतात, वास आवडतो, अशी सोपी मध्यमवर्गीय करणंच असतात खरं तर. तसंच कोंबडी न खाण्याला पण असूच शकतात की. नाही काय? या सगळ्या प्रकारात माझी मलाच मजा आली.

माझ्या शाकाहारी होण्यामागे ठोस कारणं नव्हती अशातला भाग नव्हता. पण शाकाहारी होण्या आणि न होण्यामागे इतकी ठोस करणं सापडली की गुद्दागुद्दी व्हायला लागली. त्यामध्ये अजून खोल जाण्याचा आळस, हे असं माझं कारण असावं, असं आत्ता मागे वळून बघताना वाटतंय. आपण भारतावर प्रेम का करतो? तर "भारतात जन्मलो म्हणून" हे कारण बहुतांश लोकांसाठी पुरतं. पण सांगायला बोलायला सुजलाम सुफलाम आणि संतांची भूमी बरं पडतं. तसंच ते शाकाहारी मांसाहारी प्रकरण आहे, असं मला कधी कधी वाटतं. आपण कुठं जन्माला आलो, कुठं वाढलो, यामध्येच बहुतांश लोकांची करणं संपत असतील. पुढे मित्र बदलले, जागा बदलल्या, परीस्थिती बदलली की खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. काही उरतात, काही सरतात. शेवटी काय हो, आपलं आपलं तेव्हा तेव्हा ठरलेलं असतं काय करायचं. करणं नंतर काही का सुचेनात. माझे य लोकं ओळखीचे आहेत की जे आधी मांसाहारी नव्हते पण आता आहेत. पण माझ्या वाट्याला येतं ते अटेंशन त्यांच्या वाट्याला नाही येत.

प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असा एक काळ होता. आठवतंय? तेव्हा अमुक तमुक जाडीच्या पिशव्या वापरू नका. त्या पेक्षा कागदी किंवा कापडी पिशव्या वापरा, याचा खूप कल्ला असायचा. मग तेव्हा एकदा असं वाटलं की, इतक्या पिशव्या वापराच कशाला? असलं काय पिशवी मधलं आयुष्य? चिप्सच्या पॅकेट सारखं बहुतांश पिशव्यांमध्ये हवाच तर असते! चार सीटच्या गाडीतून दोन लोक जायचं आणि हवा भरभरून पिशव्या घेऊन जायचं? खरं सांगायचं तर मला काहीही घंटा फरक पडत नव्हता, पण बसल्या बसल्या मनातल्या मनात क्रांती घडवून आणण्यासाठी हा विषय बरा होता. अजून जरा वेळ याच विषयावर घुटमळल्यानंतर असं वाटलं की पिशव्या भरभरून आणण्या इतक्या गोष्टी लागतातच कुठं आपल्याला? हू म्हणून खरेदी सुरू केली की मग प्लॅस्टिक काय, कागदी काय आणि कापडी काय? शेवटी प्रॉब्लेम म्हणून पिशवीकडे रोखलेल्या हाताची चार बोटं स्वतःकडे आहेत या विषयाकडे आपण येतोच की. याचा अर्थ, जीवन मिथ्या आहे, आणि आपण फकीर है आणि झोला लेके निघू, असं म्हणणं नाही आहे. पण आपल्या सोयीच्या नावाखाली आपल्या आजूबाजूच्या परीसराची, वातावरणाची घाऊक गैरसोय करतोय का, याची जाण असायला काय हरकत आहे?

बीनकामाचं बसलेलं असताना विचार आलेला असला तरी इसमे पॉइंट तो था! पण त्याचं आकलन होईल एवढं गांभीर्य नव्हतं. वाचनाचा आळस आणि आपले सगळेच मित्र मैत्रिणी दिव्य असल्यामुळे सुरुवातीला दिशाहीन प्रश्नांच्या चौफेर फैरी झाडणं सुरु होतं. यातूनच मी प्रथम आपण खातो पितो ते का? तेच का? आणि कशाला? इथंवर पोचलो. बाकीच्या प्रश्नांची नाही तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून मग इथे खणायला सुरु केलेलं. सुरुवात छोट्या छोट्या लुटूपुटूच्या अर्ग्युमेंट्सनी झाली. अमक्याला आवडतं म्हणून खायचं असतं. तमाक्याला नाही आवडत म्हणून खायचं नसतं, मग या महिन्यात खायचं नसतं, त्या वारी एवढंच खायचं असतं, इथपासून ते जंगलात राहायचे लोक तेव्हा प्राणीच मारून खायचे, शेती केल्यामुळेच खरतर पर्यावरणाची वाट लागली, आपल्या जबड्याचा आकार बघा, दातांची रचना बघा, आणि काय आणि काय आणि काय!

या अशाच क्षणी मर्फीला "अज्ञानात सुख असतं" ही उक्ती सुचलेली असावी. कारण यानंतर दरवेळी खाताना डोक्यात प्रश्नांचा भुंगा डोकावू लागला. एकूणच कनफ्युजन ही कनफ्युजन है, सोल्युशन कुछ पता नही... ही हालत! प्रत्येकाचं आपलं आपलं लॉजिक. त्यात कोणाचंही तुमचं आमचं सेम असतं असं नाही. या सगळ्यामध्ये सुखी माणसं म्हणजे खवय्ये लोक. त्यांचं ब्रीद, खानेका, पीनेका, न्हानेका, धोनेका, बोंब न्ही मारनेका, भाईसे पूछनेका. ऍनालिसिस पॅरालिसिस त्यांच्या गावी नाही. पण या निर्वाणापर्यंत पोचण्यासाठी मला वेळ होता.

दरम्यानच्या काळात मला बरेच नवे नवे प्रश्न मिळत राहिले, आणि साहजिकच कशाचंही एक असं घंटा उत्तर मिळालं नाही. आपण वापरतो त्या गोष्टींमुळे तसंच आपण खातो पितो त्या गोष्टींमुळे, त्या उगवण्यासाठी, त्या पोसण्यासाठी, त्यांची वाहतूक करण्यासाठी आणि त्यांचा निचरा करण्यासाठी लागणाऱ्या साधनांमुळे आपण वातावरणाची आणि आपल्या आजूबाजूच्या परीसराची खूप मोठी झीज करतो आहोत का? जिथे जे पिकतं तिथे ते खावं असं तर शाळेत सुद्धा होतं. गांधीबाबा सुद्धा म्हणाले होते की जिथे जे बनतं ते वापरावं. पण उसे कभी इस नज़र से बघितलेलं नव्हतं. ते सगळं अंगिकारायचं असतं असं कुठं सांगितलेलं? आता ते सगळं तपासून बघण्याची, त्याला उलट प्रश्न विचारण्याची ही पहिलीच वेळ. मुळात शाकाहार म्हणून आपण जे बकासुरा सारखं खातो, ते उगावण्याची आपली क्षमता आहे का? आणि प्रमाणात हवं तेवढंच खात असू तर मांसाहार केला तर योग्य आहे का? कोंबडी खाल्ली तर ठीक मग कुत्रा मारून का खात नाहीत? मांसाहार म्हणून जे प्राणी मारणार, त्यांना सुद्धा पोसायला धनधान्य लागणारच की, मग त्याची क्षमता आहे का? या सगळ्याचा एक सरसकट जगभर लागू पडेल असा क्रांतिकारी नियम होऊ शकतो का? याचा जातीधर्माशी संबंध आहे की हा केवळ कॉमन सेन्सचा भाग आहे?

एके ठिकाणी लिहिलेलं की, भारतीय उपखंडात, किंवा आफ्रिकेत कुठे कुठे, जिथे हवामान नियमित आहे, शेती खूप करता येते, तिथं शाकाहार स्वाभाविक आहे. पण इंग्लंड, रशिया, नॉर्वे सारख्या प्रदेशात जिथे हवामानाच्या नावानं बोंब आहे, जिथं शेती करताना खूप मर्यादा पडतात, तिथं मुबलक गहू, तांदूळ आणि पालेभाज्यांचा हट्ट करणंसुद्धा वेडेपणाचं आहे. उदाहरणार्थ, रशियामध्ये सायबेरीया भागात, भाजीपाल्याच्या नावानं शंख आहे. मग लोक घोडी पण खातात. त्यातल्या घोड्याच मांस काढलं की राहतं ते फॅट हे शाकाहारी म्हणून वाढतात.

मला एक WFP चा रिपोर्ट सापडला. त्यात लिहिलेलं की जगाची लोकसंख्या सात अब्ज असेल, तर आपण म्हणे साडे दहा अब्ज लोकांना पुरेल इतकं अन्न बनवतो! आणि या सातपैकी जवळ जवळ एक अब्ज लोकांना दररोज भुकेल्या पोटी झोपावं लागतं. म्हणजे एकाच बातमी मध्ये टाळ्या वाजवायचेत की आपल्या ऑलरेडी शिट्ट्या वाजलेत, हे कळेना. पण असं आहे म्हणे. मग हे अनाठायी अन्न बनतंय कोणासाठी? त्याची मागणी कोण करतंय? ते वाया कोण घालवतंय? या तीनमध्ये तुम्ही आणि मी कुठे बसतो हे आपलं आपण तपासावं.

हे सगळे लूज एंड्स आहेत खरं तर. थोडा अजून विचार केला असता तर सापडलंही असतं काहीतरी त्यातून. पण मग अशा वेळी कामी येणारी सुपर पॉवर म्हणजे - आळस. डोक्यात इतका कल्ला झाल्यावर आपण एकदम व्यावहारिक मार्ग निवडला. घाला काशी! मला पुरे झालं असं म्हणून, कापडी पिशव्या वापरायच्या आणि कंदमुळे खायचीत न? ते करू की! यावर स्वतःशीच मांडवली केली. बाकी पुणे तिथं वेजिटेरीयन माणसाला काय उणे? प्रमाणात खाओ. खुश रहो. इथे सेटलमेंट झाली. ती अजूनपर्यंत टाकलीय. बाकी प्रश्नांचं काय झालं? तर काहीच नाही झालं. ठेवलेले माळ्यावर. कधीतरी मला त्यातूनच "मेरे पास माँ है!" असं लीजेंडरी उत्तर मिळेल अशी अपेक्षा होती. पण आता त्याची गरजच संपली. मग आज फराळाच्या निमित्तानं सोडलं गाठोडं.

आणि हो ... दिवाळीच्या खुप खूप शुभेच्छा. प्रमाणात खा. 😊

Saturday, September 10, 2022

दुसऱ्याचा तो इतिहास

इतिहासाकडं एकदम निष्पक्षपणे बघता आलं पाहिजे. इतिहासामधल्या झुंजी इतिहासामध्ये ठेवता आल्या पाहिजेत. इतिहास हा भूतकाळ आहे हे समजून घेऊन इतिहासात नव्यानं झुंजी लावायचा मोह टाळला पाहिजे. जे कधी भांडलेच नाहीत, त्यांच्या नावानं आपणही भांडलं नाही पाहिजे. "सिकंदरने पोरससे की थी लड़ाई, तो मै क्या करू?" हा अलिप्तपणा जमला पाहिजे. मग त्यात सिकंदरचं गोत्र किंवा पोरसचं कुलदैवत काढू नये. सिकंदर आणि पोरस हे शेवटी एकमेकाचे बेश्ट फ्रेंड्स झालेले हे वाचून सोडून द्यावं. एकूण काय? तर इतिहासाकडे केवळ इतिहास म्हणून बघावं. "इति... हास..." या शब्दाचा अर्थ इति(पण)हास किंवा इति(का)हास असा नसून, "असं झालं" हा एवढाच आहे समजून घ्यावं. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" म्हणजे "आपल्याला ठेच लागतायत म्हणून इतिहासाला शहाणं करायचं" असा असू नये. जसं तेंडुलकरकडे दहावी बारावीच्या अभ्यासातले सल्ले विचारू नयेत, किंवा सद्गुरू जग्गी कडे रॉकेट सायन्स विचारू नये, तसं इतिहासातल्या लोकांकडे त्यांच्या त्यांच्या गोष्टी पुरतं बघावं. सगळ्यांनी सगळ्या परीक्षांत अव्वल यावं अशी अपेक्षा करणं फोल आहे हे शिकवणाऱ्या केवळ दोनच गोष्टी... एक म्हणजी आपली स्वतःची गुणपत्रिका आणि इतिहास. समस्त गरजू होतकरू आणि होऊ घातलेल्या क्रांतिकारी लोकांनी या दोनीही गोष्टींचा विसर पडू देऊ नये.
.
हं.... हुश.... आता साईड बी.
.
या वरच्या सगळ्या गोष्टी खूप आदर्श आणि पुस्तकी वाटतात का तुम्हाला? मलापण वाटतात. अहो हे सगळं ब्रह्मज्ञान आहे. म्हणजे हे लोकांना सांगायचं असतं. आपल्यासाठी थोडंच असतं? आता मला सांगा, इतिहासाने आणि इतिहासातल्या लोकांनी आपल्या सगळ्यांच्या फॅन डिमांड पुऱ्या करायच्या नाहीत, तर अजून कोणी करायच्या? जिवंत लोकांनी? छे! आम्ही इतिहासाचं रक्षण करायला झटत नाही? मग इतिहासानं पण एवढं आमच्यासाठी केलं पाहिजे की. अहो केवढ्या भावना गुंतवतो आम्ही त्यात. केवढ्यांदा अस्मिता दुखावून घेतो. इतिहासातल्या लोकांनी चार गोष्टींच्या ऐवजी दोनच सांगितल्या असतील तर आम्ही स्वतःच्या पदरच्या दोन गोष्टी त्यांना देऊ करतो! मग हे असं सगळं असताना, इतिहास म्हणजे फक्त इतिहास असं बघणं म्हणजे RRR audible वर ऐकण्यासरखं नाही? मला वाटतं आपला तो इतिहास नसतोच मुळी.
.
आता परत साईड - ए.
.
मलाही वाटतं, आपला तो इतिहास नसतोच मुळी. दुसऱ्याचा तो इतिहास असतो. खरं शिकायला तिथूनच मिळू शकतं. कारण दुसऱ्याच्या इतिहासात आपण निरपेक्ष होऊ शकतो. त्याला तासून बघू शकतो. घासू पुसू शकतो. खंगळून काढू शकतो. काही गवसलं नाही तर बिनदिक्कत पान पालटू शकतो. आणि कधी कधी मस्करी पण करू शकतो. आता बघा, तुम्हाला अर्जेंटिनाचा इतिहास सांगितला तर? किंवा इटली किंवा स्पेनचा कोणी संत महात्मा गाठून दिला तर? थायलंड आणि स्वित्झर्लंड मधल्या शौर्य गाथा ऐकवल्या तर? आपण ते डब झालेले सिनेमे नाही का बघत? तसं आहे हे. दुसऱ्याच्या इतिहासात माणसांना काळंच किंवा गोरंच असायचा शाप नसेल. दुसऱ्याचा इतिहासातले लोक, काळ्या आणि गोऱ्याच्या अधे मध्ये असू शकतील. तिथे रावणाला पण थोडं चांगलं असायची मुभा असेल, किंवा रामाच्या पण कोणी खोड्या काढू शकत असेल. आणि त्यामुळं अस्मिताचं पण काहीच दुखावत नसेल. प्रयत्न करून बघा. डब झालेले सिनेमे बघायचा नाही... दुसऱ्याचा इतिहास बघायचा. मी केलाय अगदी नुकताच. असते एक्कोही कहानी पण आपल्यालाच जरा वेगळ्याने कळतात.
.
-----------------------------------
.
उदाहरणादाखल इंग्रज घ्या. आता इंग्रज भारतात आले आणि मग त्यांनी काय केलं हे तूर्तास बाजूला ठेवू. आपण त्याच्याही खूप खूप आधीचं बघू. एक काळ असा होता की इंग्रजाना कोणीही यावं आणि टपली मारून जावं असं करायचे. किती लोकांनी टपल्या मारल्या म्हणून सांगू? येता जाता, वेळ जात नाही म्हणून, विरंगुळा म्हणून, खायचे प्यायचे वांदे झाले म्हणून, यंदा थंडी जरा जास्ती आहे म्हणून, आमच्या वन्सं जरा नाराज आहेत म्हणून, आमच्या चिरंजीवाना तुमच्या चिरंजीवाची खोडी काढायची आहे म्हणून, किंवा आमच्या आज्ज्याचं थोडं देणं बाकी आहे म्हणून, काहीच नाही तर, आज कुछ तुफानी करते है म्हणून आक्रमणावर आक्रमणं करायचे लोक. केवढाले लोक इंग्लंड मध्ये आले, काही निघून गेले आणि बरेचसे इंग्लंडचे म्हणून राहिले. बसल्या बसल्या त्यांनी, इंग्रजी भाषेवर, पोषाखावर, राहणीमानावर आपापली छाप सोडली. शीप ऑफ थेसिस सारखं कोडं ब्रिटिश जनतेला कसं नाही पडलं याचं मला कोडं पडतं कधी कधी.
.
(मुन्नाभाई ने कसं चाळीस पानी पुस्तकातून समस्त गांधीजी शिकले असं स्वतःला वाटवून घेतलेलं, तसं हे मी चाळीस तासात युट्यूब वरून जमवलेलं उथळ पाणी आहे. त्यामुळे तज्ञ वाचकांनी दुरुस्त्या सुचवताना हयगय करू नये.)
तर... मला इंग्रजांचा इतिहास वाचताना वाटलं की इंग्रजांनी ते पारतंत्र्यात आहेत हे मान्यच न केल्यामुळे कदाचित त्यांच्याकडच्या कुठल्याच लढाईला स्वातंत्र्य लढाई म्हणत नसावेत. सारखं "पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त" असं असावं. बघा की... इंग्रजांचा कुठं आहे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी? पण लोकांनी यांच्यावर राज्य केलीयेत मात्र. कधी जर्मन, कधी नॉर्वेजियन, कधी डेन्मार्कवासी, कधी शेजारचे स्कॉटिश आणि फ्रेंच तर येऊन जाऊन मुक्कामाला असायचेच. "मी पुन्हा येईन" "मी पुन्हा येईन" म्हणत लोक परत परत यायचे हो भांडायला! मला वाटतंय मी त्या काळी, नेटफ्लिक्स नव्हतं आणि अमेझॉन फक्त जंगल होतं म्हणून लोकांच्याकडे मारामाऱ्या करायला इतका वेळ असावा! कोणीही यावं टपली मारून जावं. एकदा तर एका राजाला इंग्रजी येत नव्हतं फारसं म्हणून त्यानं एक मंत्री नेमला मदतीला. त्या बाबाला पंतप्रधान म्हणायला लागले. आणि मग तिथून पुढे राजा आणि राणीच्या खांद्याला खांदा देऊन पंतप्रधान सुरूच राहिला. की तो अजूनही आहे.
.
एकदा वायझेड दिसणाऱ्या वायकिंग्ज लोकांनी इंग्रजांवर आक्रमण केलं आणि सुमारे शे सव्वाशे वर्षं इंग्लंड मधून बुड हलवलंच नाही. मग आला आल्फ्रेड. आल्फ्रेड इंग्रजच होता. त्यानं वायकिंग राजांना हरवलं. आणि आपलं छोटंसं राज्य बनवलं. पण आल्फ्रेड जनतेला म्हणाला की बाबो... हे वांयकिंग लोक वायझेड असेल तरी आता आपलेच आहेत की. त्यांच्या इतक्या पिढ्या इथे राहिल्या, इथे रुजल्या. मग आता आपलं काय आणि त्यांचं काय हे कसं ठरवणार? आल्फ्रेड त्यांच्या काळातला नाना पाटेकर होता. त्यानं इंग्रजांचं रक्त आणि वायकिंग लोकांचं रक्त आपल्या हातावर एकत्र करून चौकात विचारलं, "अब बोल इसमें अंग्रेज़ी खून कौनसा है और वाइकिंग खून कौनसा है?" आपण राहू की सगळे गुण्या गोविंदानं! असं म्हणाल्यावर, लोकांना लै च आवडला आल्फ्रेड आणि त्यांनी त्याला "आल्फ्रेड दी ग्रेट" पदवी दिली. इंग्लंड मध्ये नंतर जे जे म्हणून राजे आणि राण्या झाल्या, अगदी दुसऱ्या एलिझाबेथ पर्यंत, सगळ्यांचे पूर्वज बघत गेलात की ते शेवटी या आल्फ्रेड कडे कुठूनतरी पोचतातच. आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सगळ्या राजा बीजांपैकी आल्फ्रेड या एकट्यालाच म्हणेज "the great" म्हणतात.
.
आहे कि नाही भारी गोष्ट. आपण त्रयस्थ पणे किती मजेत वाचू शकलो की नै? आता जरा अशीच आपल्याकडची गोष्ट सांगून मामला टेन्स करू?
.
चला ... आता याची साईड - बी
.
तुम्हाला माहिती आहे काय की गांधी बाबांनी पण सांगितलेलं एकदा की इंग्रजांना हाकलणे म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे असं नाही आहे. स्वातंत्र्य मिळालं तरी इंग्रज राहूच शकतात की आपल्याकडे. आता गांधी काय नी गोखले काय? त्यांनी इंग्रजी साहित्य वाचलं म्हणून त्यांची टीका पण झालेली म्हणे. काय माहिती, गांधींना पण आल्फ्रेडची गोष्ट आवडली असेल आणि मग त्यांनी लालसिंग चड्डा सारखं त्या गोष्टीचं भारतीयीकरण केलं असेल. आणि मग बॉयकॉट लालसींग चड्डा करण्याच्या नादात, मुख्य मुद्दा बाजूला राहिला असेल. आता बघा होनेको सब कुछ हो सकता है की नै?
.
गांधीनी न, आपल्या "हिंद स्वराज्य" पुस्तकात (चाळीस पानाचंच आहे ते पण. तसे आपले सगळे संदर्भ चाळीस पानी पुस्तकातलेच आहेत 😜) एक गमतीशीर गोष्ट सांगितलीय. ती मला आठवतेय आत्ता ती अशी (तज्ञ मंडळींनी दुरुस्ती नक्कीच सुचवा जर सदर्भात काही गडबड झाली असेल तर). गांधी म्हणाले की, समजा तुमच्या गावात एक भांग विकणारा आला. आणि त्यानं सगळ्या गावाची वाट लावली. तर तुम्ही सगळे पेटून उठून भांगवाल्याला गावातून हाकलून द्यायला निघाल. कदाचित हाकलून द्याल सुद्धा. पण आपण त्याला स्वातंत्र्य म्हणू का? उद्या भांगवाल्याच्या ठिकाणी दारूवाला आला तर? दारूवाला तुमच्यातलाच असला तर? म्हणून आपण जे भांगेच्या आहारी गेलो ते म्हणजे पारतंत्र्य. आणि ते दुरुस्त केलं आपण, तर मग उद्या कोणी येऊन दारू विको किंवा अफूच्या गोळ्या विको. काय फरक पडतो? बाहेरून येणारा वाईटच असेल किंवा आतमध्ये असलेला चांगलाच असेल असं थोडीच असत. आपण चांगल्या गोष्टी ठेवू, वाईट सोडून देऊ. मग आपल्यात ब्रिटिश लोक येऊन राहू देत किंवा आणखी कोणी येऊन राहू देत? काय फरक पडतो? हे खरं स्वातंत्र्य.
.
आता बघा. हे सगळं निरपेक्ष आणि निष्पक्षपणे वाचू शकला का? आता आल्फ्रेडच्या गोष्टीवर पण टीपणी करायची खुमखुमी आली का? आता इथून ही गोष्ट पुढे कुठेही ओढून घेऊन जात येऊ शकते.
.
मे बी तुम्ही अलिप्तपणे वाचू शकला असाल. मे बी तुम्हाला आधीच टिपणी करायची खुमखुमी अली असेल. पण I think I made my point.
.
ता.क. मुद्दा काय? वाचून मजा घ्यायची, त्यातून काही शिकायचं असा कुठला इतिहास असेल तर तो दुसऱ्याचा इतिहास. Long Live अस्मिताs.

दहीहंडी, बील गेट्स आणि बरंच वेगळं काही काही

हॅपी दही हंडी म्हणायचं होतं खरं तर. पण हे लिहिता लिहिता गणपती बाप्पा मोरया म्हणायची वेळ आलीय. मग तोच मांडव वापरून मूर्ती बदलावी असा चतुर विचार आलेला खरा. पण मग मुद्दा तो नाहीचे हे आठवलं.
तर... इक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी, जब भी मिलती थी उससे, यही पूछा करती थी, प्यार कैसे होता है? ये प्यार कैसे होता है? और मग पुढे... मग पुढे साधुवाणीची बोट बुडते. त्याची गर्लफ्रेंड त्याला गावभर शोधते. आणि मग एके ठिकाणी प्रसाद खाते आणि तिकडे साधुवणीची बोट परत तरते. त्यानंतर... त्यानंतर अकबर नाराज होतो, शहजादा सलीमला फाटा देऊन अनारकलीला भिंतीत टाकून शांतीत क्रांती करतो.
आता बघा, केवढे म्हणून सिनेमे, नाटकं, पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, आणि कविता खपल्या असतील या तुमचं आमचं सेम असणाऱ्या प्यार कैसे होता है वर? या सगळ्या प्यार, इजहार, तकरार, इकरार यांच्या भाऊ गर्दी मध्ये फ्रेंड झोन झालेला प्रकार म्हणजे ब्रेक अप किंवा त्याही पुढे जाऊन घटस्फोट. याला इतकी सावत्र वागणूक का दिलीय याचं एक नवल आहे.

या प्रकाराची एकूणच केविलवाणी अवस्था आहे. एक म्हणजे ग्रेसफुली ब्रेकअप किंवा घटस्फोट करायला कोणी शिकवत नाही. किंवा कोणी केला असेल तर त्यांचं चारचौघात कौतुक करत नाहीत. कायम ते अस्पृश्य असल्यासारखं वस्तीपासून लांब ठेवलंय! प्रेम करणाऱ्या लोकांना सरसकट एकत्र करून इश्क वाले, प्यार वाले, अशी छचोर का असेनात, काहीतरी नावं असतात. ब्रेकअप वाल्यांचं तसं नाही. त्यांची असली कुठली संघटना नाही की काही छचोर नावं पण नाहीत. त्यांना कोणी स्फोट वाले, किंवा तुकडे तुकडे गँग असंही म्हणत नाहीत. "ब्रेक अप" ला तर मराठी मध्ये शब्द पण नाही. "आमचं मोडलं" हे असं निरुत्साही म्हणून ब्रेक अप साजरा करावा लागतो. "घटस्फोट" या शब्दाबद्दल तर आता कायच सांगा! इथे पाळण्यातच घटोत्कच सारखं नाव ठेवून पूर्वग्रहदूषितकरून ठेवलाय.
 
आता मला सांगा, नुकतीच दहीहंडी पार पडली. त्यासाठी कोणा कोणा सेलिब्रिटी लोकांना बोलावलं. ढोल ताशे वाजवले. लोक नाचून धुंद झाले. पण शेवटी केलं काय? थरावर थर रचून, शेवटी घटच फोडला न? मग या सगळ्या प्रकरणाला "घटस्फोट" असं नाव का बरं दिलं नसेल? म्हणजे विषय तोच की नै? मी म्हणतो, "घटस्फोट" शब्दाचा दर्जा वाढवायचा असेल तर एक तर त्याला दही हंडी असं काहीतरी म्हणावं. नाहीतर चक्क "घटस्फोट" झाला म्हणण्याच्या ऐवजी आम्ही "दही हंडी" केली असं म्हणण्याची प्रथा करावी. त्याशिवाय हे बदलणार नाही.

जर दोन लोकांनी एकत्र येणं ही चांगली गोष्ट असेल. तर दोन लोकांनी वेगळं होणं सुद्धा असायला काय हरकत? दोन लोकांनी एकत्र येण्यात जर उज्ज्वल, समृद्ध शक्यता दडलेल्या असतात, तर तसंच दोघांनी आपापली डोकी ठिकाणावर ठेवून वेगळं होण्यात सुद्धा असूच शकतात. आणि मग डोकी ठिकाणावर न ठेवताच करायचं असेल तर लग्न करा, लफडी करा, नाहीतर काशी घाला. कुठं काय फरक पडतो? माझं तर असं म्हणणं आहे की वेगळं होण्याचे निर्णय पण दही हंडी सारखे गाणी लावून, नाच करून, एकमेकांना शुभेच्छा देऊन, साजरे केले पाहिजेत. जसे लग्न समारंभ हटके करायची शर्यत असते, तसं इथपण पिअर प्रेशर तयार करायला हवं. प्री-वेडिंग शूट सारखे, पोस्ट डिव्होर्स शूट केले पाहिजेत. आता आपण एकत्र नसलो तरी जिथे आहोत तिथं बरे आहोत, हे बघून पण बरं वाटू शकेलच की. आणि अहो जिडीपी पण वाढेल. दोन हजाराच्या नोटमध्ये नॅनो चीप घालून जशी हवा तयार केलेली, तशी काहीतरी क्रांतिकारी थिअरी डिव्होर्स बद्दल पण उठली पाहिजे. उदाहरणार्थ, "यंदा डिव्होर्स जरा जास्त झालेत" याच्या बरोबर "यंदा देशाची प्रगती पण जास्ती झालीय" हे ही आहेच की. You see where I'm going with this? ठरवलं तर थेट नॅशनल आणि अँटी नॅशनल पर्यंत जाऊ शकतो आपण या वाटेने. लफडी लपवून करायची असतात तर ती उघड्यावर करतात पब्लिक. आणि घटस्फोट बद्दल मात्र चिडीचूप?! ही काय पद्धत?

विनोदाचा मुद्दा जरा बाजुला ठेवू. लोकांनी डिव्होर्सच करावेत असं माझं म्हणणं नाही आहे. पण केले तर बरे करावेत हा मुद्दा आहे. काही महिन्यांपूर्वी, बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्सनी दही हंडी खेळली. त्यांनी गेल्या सत्तावीस वर्षात जे थर रचले, यंदा त्यावर चढून घट फोडला. ते म्हणाले, "व्यक्ती म्हणून आपल्याला जसं वाढायचं आहे, तसं आता एकत्र वाढत येत नाहीए. मग वेगळं होऊन प्रयत्न करू. मार्ग अवघड आहे, म्हणून आम्हाला आमचा आमचा शोधू द्या." अशा आशयाचा एक संदेश त्यांनी ट्विटरवर टाकला. बिल आणि मेलिंडाने सुरु केलेलं फाऊंडेशन ते अजूनही एकत्रच सांभाळतील हेही त्यात नमूद केलं.

देखा? ऐसे भी कर सकते है! विचार करून. शंतीत. शिस्तीत. खरं सांगायचं तर ही बातमी वाचून जरा कसंस झालेलं पण पुढे वाचून विंडोज टेन बघून कसं अचानक बरं वाटलं तसं बरं वाटलं. करत असतील की लोकं खरंच समजून सावरून. आपल्याच डोळ्यांवर चष्मा असेल तर.

असो.
हॅपी दही हंडी म्हणायचं होतं खरं तर. पण आता गणपती बाप्पा मोरया.